Headlines

भारत-न्यूझीलंड कराराचा महाराष्ट्राला मोठा फायदा:पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूरच्या उद्योगाची नवी झेप




भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रातील उद्योगविश्वासाठी मोठ्या संधी निर्माण होणार असल्याचे स्पष्ट चित्र समोर येत आहे. विशेषतः पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि कोल्हापूर या औद्योगिक शहरांना या कराराचा मोठा लाभ मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या करारामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना न्यूझीलंडच्या बाजारपेठेत अधिक सुलभ प्रवेश मिळणार असून निर्यातीतील अडथळे कमी होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यात गुंतवणूक वाढण्याबरोबरच रोजगारनिर्मितीलाही मोठी चालना मिळू शकते. महाराष्ट्रातून न्यूझीलंडकडे होणाऱ्या निर्यातीत अभियांत्रिकी वस्तूंचा सर्वाधिक वाटा असल्याचे समोर आले आहे. त्यानंतर रत्ने आणि दागिने, रसायने, औषधे तसेच इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची निर्यात मोठ्या प्रमाणात केली जाते. या करारामुळे महाराष्ट्रातील उद्योगांना आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धात्मक संधी मिळतील, असे मत उद्योग क्षेत्रातून व्यक्त होत आहे. विशेषतः देशातील महत्त्वाचे उत्पादन केंद्र मानल्या जाणाऱ्या पुण्याला या करारातून मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि वाहन उद्योगातील पुण्याचे योगदान लक्षात घेता या क्षेत्रातील निर्यात वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चरने याबाबत सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. ‘एमसीसीआयए’च्या मते, महाराष्ट्रातील अन्नप्रक्रिया उद्योगासाठी हा करार अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. तयार खाद्यपदार्थ, मिठाई, पौष्टिक खाद्यपदार्थ आणि कृषी क्षेत्रातील सेंद्रिय उत्पादनांना शून्य निर्यात शुल्काचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. न्यूझीलंडमधील ग्राहकांची उच्च क्रयशक्ती आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांबद्दल असलेली आवड लक्षात घेता महाराष्ट्रातील उत्पादकांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होऊ शकते. विशेष म्हणजे सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसह नवउद्योजकांनाही या करारामुळे मोठे व्यासपीठ मिळणार आहे. महिला आणि युवा उद्योजकतेला चालना देण्यावरही या करारात विशेष भर देण्यात आला आहे. त्यामुळे नव्या स्टार्टअप्सना जागतिक बाजारपेठेत प्रवेश करण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र हा देशातील प्रमुख औद्योगिक राज्य असल्याने निर्यात, रोजगार आणि गुंतवणूक या तिन्ही आघाड्यांवर राज्याला मोठा फायदा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वस्त्रोद्योग क्षेत्रालाही या कराराचा फायदा होणार असून नागपूर, इचलकरंजी आणि सोलापूर येथील उद्योगांना निर्यात वाढवण्याची मोठी संधी मिळू शकते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *