![]()
शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम असून हवेत कमालीचा दमटपणा जाणवत आहे. भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवस मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तविला असला, तरी गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत शहरासह जिल्ह्यात केवळ १.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हवामान विभागाच्या नोंदीनुसार, सकाळी सापेक्ष आर्द्रता ८४ टक्क्यांपर्यंत पोहोचली होती. किमान तापमान २४.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. वातावरणात पुरेसा ओलावा असूनही पाऊस न झाल्याने ‘ढग आहेत, पण पाऊस नाही’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. दुसरीकडे जिल्ह्याच्या जून महिन्यातील पावसाची सरासरी ९०.२ मिमी असताना आतापर्यंत केवळ ३७.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे जिल्हा अद्याप सरासरीच्या केवळ ४१.४ टक्के पावसावरच आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील पेरण्यांचा वेगही अपेक्षेप्रमाणे वाढलेला नाही. अनेक भागांत शेतकरी पहिल्या दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हवामान विभागाने २६ ते २८ जूनदरम्यान मेघगर्जना, विजांचा कडकडाटासह वेगाने वारे वाहण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे पुढील तीन दिवस जिल्ह्यासाठी निर्णायक ठरणार आहेत. {२६ ते २८ जूनदरम्यान मेघगर्जनेचा अंदाज { ३० ते ५० किमी प्रतितास वेगाने वारे { काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरींची शक्यता { खरीप पेरण्यांसाठी हा कालावधी निर्णायक { जूनअखेर तूट कमी होणार की वाढणार, याकडे लक्ष ^ ढग आणि आर्द्रता असली म्हणजे लगेच पाऊस पडतोच असे नाही. वातावरणात पुरेसा ओलावा, ढगांची उंची, हवेचा दाब, वाऱ्यांची दिशा आणि तापमान यांचा योग्य मेळ जमल्यानंतरच पावसाची प्रक्रिया पूर्ण होते. मान्सूनला चालना देणारी कोणतीही प्रभावी हवामान प्रणाली सध्या महाराष्ट्राजवळ सक्रिय नसल्याने पावसाचा जोर वाढत नाही. मान्सूनचे वारे जोर पकडत नसल्यानेच मान्सूनची स्थिती कमकुवत झाली आहे. १ जुलैपासून मान्सूनचा पाऊस वेग पकडणार आहे. त्याचबरोबर शेतकरी वर्गाने जमिनीत ७ इंच ओल असल्याशिवाय पेरण्या करू नये. – रवी आंधळे, शास्त्रज्ञ, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी. पुढील ७२ तास महत्त्वाचे
Source link
मान्सूनची दिशा अन् दशा:शहरावर दाटले ढग, दमटपणा वाढला पण पाऊस काही बरसेना