![]()
एकेकाळी ऊस आंदोलनाच्या मैदानात खांद्याला खांदा लावून लढणारे, मात्र नंतरच्या काळात राजकीयदृष्ट्या एकमेकांपासून दुरावलेले दोन मोठे नेते अनेक वर्षांनंतर जाहीरपणे एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आमदार सदाभाऊ खोत यांनी इंदापूर न्यायालयाच्या आवारात एकत्र येत चहाचा आस्वाद घेतला. गेल्या काही वर्षांत या दोन्ही दिग्गज नेत्यांमध्ये मोठे राजकीय मतभेद निर्माण होऊन त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या होत्या. मात्र, आज अचानक हे दोघेही एकाच टेबलवर बसून चहा पिताना आणि एकमेकांशी मनमोकळ्या गप्पा मारताना दिसल्याने, उपस्थित शेतकरी कार्यकर्त्यांसह महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांची इंदापूरमधील ही भेट कोणत्याही राजकीय कारणास्तव नसून, एका जुन्या आंदोलनाच्या न्यायालयीन सुनावणीनिमित्त झाली होती. 2011 साली उसाला योग्य भाव मिळावा यासाठी पुकारण्यात आलेल्या तीव्र राज्यव्यापी आंदोलनादरम्यान या दोन्ही नेत्यांसह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते, आणि याच खटल्याच्या सुनावणीच्या तारखेसाठी शुक्रवारी हे दोन्ही नेते इंदापूर सत्र न्यायालयात एकत्र आले होते. न्यायालयीन कामकाजानंतर दोन्ही नेत्यांनी एकत्र बसून घेतला चहा इंदापूर सत्र न्यायालयातील कामकाज संपल्यानंतर सर्वांना एक सुखद धक्का बसला. कारण कोर्टाबाहेर आल्यावर राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांनी चक्क एकाच हॉटेलमध्ये एकत्र बसून चहाचा आस्वाद घेतला. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी काही वेळ मनमोकळ्या गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि अनेक वर्षांनंतर हे दोन जुने सहकारी अशा प्रकारे जाहीरपणे एकत्र आल्याचे पाहून, त्यांना पाहण्यासाठी कोर्टाच्या आवारात कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उसळली होती. राजकीय वर्तुळात चर्चा राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्या या चहाच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले असून, ही भेट केवळ न्यायालयीन कामकाजाच्या तारखेपुरतीच मर्यादित होती की भविष्यातील नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे, याबाबत आता तर्कवितर्क लढवले जात आहेत. शेतकरी चळवळीतून पुढे आलेले हे दोन मोठे चेहरे पुन्हा एकदा एकत्र आल्यास राज्याच्या राजकारणावर, विशेषतः ग्रामीण भागात, त्याचा मोठा आणि निर्णायक परिणाम होऊ शकतो, असे जाणकारांचे मत आहे. राज्यात सध्या ऊस दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून आगामी गळीत हंगामही तोंडावर आहे. अशा या अत्यंत महत्त्वाच्या काळात महाराष्ट्राच्या शेतकरी चळवळीतील हे दोन आक्रमक नेते एकत्र चहा घेताना दिसल्यामुळे सामान्य शेतकऱ्यांमध्ये नवी आशा पल्लवित झाली असून, त्यांच्या या अनपेक्षित भेटीमुळे आगामी काळात राज्यातील शेतकरी आंदोलनाला पुन्हा एकदा नवी धार मिळणार का, याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिले आहे.
Source link
राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत पुन्हा एकत्र?:एकाच हॉटेलमध्ये अन् एकाच टेबलवर बसून घेतला चहाचा आस्वाद; अनेकांच्या भुवया उंचावल्या