![]()
उष्णतेच्या लाटेने वर्धा जिल्हा अक्षरशः होरपळून निघत असून शनिवारी तब्बल 45 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. देशात सर्वाधिक तापमान नोंदवल्यामुळे वर्धा हॉटस्पॉट ठरला असून ‘रवी’च्या प्रखर तडाख्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. दुपारच्या सुमारास रस्ते ओस पडलेले दिसत असून नागरिकांनी घरातच थांबणे पसंत केले आहे. उकाड्याचा फटका सर्वाधिक शालेय विद्यार्थ्यांना, कामगारांना आणि रस्त्यावर काम करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. अनेक ठिकाणी उष्माघाताची लक्षणे दिसून येत असून रुग्णालयांतही उष्णतेशी संबंधित तक्रारी वाढू लागल्या आहेत. पाण्याची कमतरता, सावलीचा अभाव आणि वीजपुरवठ्याच्या अडचणी यामुळे परिस्थिती आणखी बिकट होत असल्याचे चित्र आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवस तापमान आणखी वाढण्याचा इशारा देत येलो अलर्ट जारी केला आहे. तरीही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना दिसून न आल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शीतल केंद्रांची उभारणी, तसेच आरोग्य सेवांची तत्परता यांसारख्या उपाययोजनांची तातडीची गरज व्यक्त केली जात आहे. दरम्यान, बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पसरला असून दुपारच्या वेळी व्यापारावरही परिणाम झाला आहे. उष्णतेच्या तीव्रतेमुळे ग्रामीण भागातही जनजीवन विस्कळीत झाले आहे. ‘रवी’चा हा प्रकोप कायम राहिल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात असून प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. देशातील सर्वाधिक तापमान असलेल्या १० शहरांची माहिती: १. बांदा (उत्तर प्रदेश): ४५.४°C
२. निर्मल – दस्तराबाद (तेलंगणा): ४४.५°C
३. अमरावती (महाराष्ट्र): ४४.४°C
४. अकोला (महाराष्ट्र): ४४.१°C
५. वर्धा (महाराष्ट्र): ४३.९°C
६. कर्नूल (आंध्र प्रदेश): ४३.४°C
७. नागपूर (महाराष्ट्र): ४३.४°C
८. सोलापूर (महाराष्ट्र): ४३.३°C
९. आदिलाबाद (तेलंगणा): ४३.३°C
१०. मालेगाव (महाराष्ट्र): ४३.२°C
Source link
वर्धा देशात 'हॉटस्पॉट'!:45 अंश सेल्सिअस तापमानासह जिल्हा अक्षरशः होरपळला, सूर्याचा प्रकोपाने रस्ते ओस