![]()
महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये मोठी हालचाल सुरू झाली आहे. पक्षाच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक आज रात्री वर्षा निवासस्थानी पार पडणार असून, या बैठकीत उमेदवारांच्या नावांवर सविस्तर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर काही निवडक नावांचा प्रस्ताव केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे इच्छुकांमध्ये प्रचंड उत्सुकता आणि हालचाल वाढली आहे. या निवडणुकीत एकूण 10 जागांपैकी भाजपच्या वाट्याला 6 जागा येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या सहा जागांसाठी कोणाला उमेदवारी मिळणार, यावर पक्षांतर्गत जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, यावेळी पक्षातील जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याचा विचार होत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. याशिवाय जातीय आणि प्रादेशिक समतोल साधण्यावरही भर दिला जाणार आहे. पोटनिवडणुकीच्या एका जागेसाठी प्रज्ञा सातव यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. उर्वरित पाच जागांसाठी अनेक दिग्गज नेत्यांची नावे पुढे येत असून, अंतिम निर्णय मात्र केंद्रीय नेतृत्वाच्या मंजुरीनंतरच होणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांनी मुंबईत गाठीभेटी वाढवल्या असून, सह्याद्री अतिथीगृहासह विविध ठिकाणी राजकीय हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी माधवी नाईक, राजेश पांडे, रणजितसिंह निंबाळकर, राम सातपुते, संजय काका पाटील, संजय केणेकर, प्रज्ञा सातव, अर्चना पाटील चाकूरकर, दादाराव केचे, संजय भेंडे, संदीप जोशी आणि दयाशंकर तिवारी या नेत्यांची नावे चर्चेत आहेत. या सर्वांनी आपापल्या पातळीवर लॉबिंग सुरू केल्याचे दिसत आहे. त्यामुळे अंतिम यादी जाहीर होईपर्यंत पक्षातील वातावरण तापलेले राहणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक 12 मे रोजी होणार आहे. मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत होणार असून, त्याच दिवशी निकालही जाहीर केला जाणार आहे. विशेष म्हणजे, आमदारांना दोन वेळा मतदान करावे लागणार असून, दोन्ही निवडणुकांसाठी वेगवेगळे मतदानाचे गणित असणार आहे. अंतर्गत संतुलन साधण्याची मोठी कसोटी सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार, महायुतीला 10 पैकी 9 जागांवर विजय मिळवणे सहज शक्य असल्याचे मानले जात आहे, तर महाविकास आघाडीला एका जागेवर समाधान मानावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपसाठी ही निवडणूक केवळ औपचारिक नसून, अंतर्गत संतुलन साधण्याची मोठी कसोटी ठरणार आहे. आता अंतिम यादीत कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Source link
विधानपरिषदेसाठी भाजपच्या कोअर कमिटीची आज महत्त्वाची बैठक:एका जागेसाठी शिक्कामोर्तब; निवडक नावांचा प्रस्ताव