![]()
एरवी विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेणाऱ्या शिक्षकांना आता स्वतःचीच परीक्षा द्यावी लागणार आहे. शासनाने सप्टेंबर २०२८ पूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण करणे अनिवार्य केले असल्याने, नोकरी वाचवण्यासाठी शिक्षकांची धडपड सुरू झाली आहे. आगामी रविवार, २८ जून रोजी ही परीक्षा होणार आहे. या परीक्षेसाठी अमरावती तालुक्यात ३८ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. एकूण १८ हजार ११९ शिक्षकांनी परीक्षेसाठी ऑनलाइन नोंदणी केली आहे, ज्यात ७ हजार ३९१ प्राथमिक आणि १० हजार ७२८ माध्यमिक शिक्षक आहेत. प्रत्यक्ष किती शिक्षक उपस्थित राहतात, हे रविवारी स्पष्ट होईल. परीक्षेत पहिली ते चौथीच्या प्राथमिक शिक्षकांसाठी वेगळी आणि सहावी ते आठवीच्या माध्यमिक शिक्षकांसाठी वेगळी अशा दोन स्वतंत्र प्रश्नपत्रिका असतील. प्राथमिक शिक्षकांची परीक्षा सकाळी १०.३० वाजता, तर माध्यमिक शिक्षकांची परीक्षा दुपारी २.३० वाजता सुरू होईल. दोन्ही पेपर प्रत्येकी अडीच तासांचे असतील. जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा संनियंत्रण समिती या परीक्षेचे आयोजन करत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यम गांधी या समितीचे उपाध्यक्ष आहेत, तर शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिव म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे देखरेख ठेवली जाईल. गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी, सीईओ यांच्यासह पोलीस आयुक्त कार्यालयाचे अधिकारीही परीक्षा केंद्रांना भेटी देणार आहेत. प्राथमिक, माध्यमिक आणि योजना विभागाच्या शिक्षणाधिकाऱ्यांची भरारी पथकेही अचानक तपासणी करतील. परीक्षेची प्रक्रिया अधिक सुरक्षित करण्यासाठी बायोमॅट्रिक, स्क्रीनिंग आणि फेस रेकग्निशन तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. ही सर्व तांत्रिक पडताळणी वेळेत पूर्ण होणे आवश्यक असल्याने, सर्व परीक्षार्थ्यांनी परीक्षा केंद्रांवर वेळेपूर्वीच उपस्थित राहावे, असे आवाहन सदस्य सचिवांनी केले आहे.
Source link
शिक्षकांना द्यावी लागणार टीईटी परीक्षा:नोकरी टिकवण्यासाठी 18 हजार शिक्षक 38 केंद्रांवर चाचणी देणार