![]()
केंद्र शासनाचा प्रस्तावित भारत- अमेरिका व्यापार करार तातडीने रद्द करावा या मागणीाठी हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने मंगळवारी ता. 21 धरणे आंदोलन करण्यात आले आहे. येथील महात्मा गांधी चौकातील संविधान कॉर्नर येथे आयोजित या आंदोलनात काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुधीर सराफ, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रशांत उर्फ बंटी नागरे, सुशांत लोखंडे, शांमराव जगताप, मिलींद उबाळे, शेख जुबेर मामू, संग्राम नायक, शेख अख्तर, अतुल नायक, विशाल इंगोले यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले आहेत. केंद्र सरकारचा प्रस्तावित भारत-अमेरिका व्यापारी करार हा देशातील शेतकरी, ग्रामीण अर्थव्यवस्था अन अन्नसुरक्षेस घातक ठरणारा आहे. या करारामुळे अमेरिकेतील कृषी उत्पादनांना शुन्य टक्के आयात शुल्क लागणार असून त्यामुळे स्वस्त विदेशी शेतीमाल भारतीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर येतील. त्यामुळे भारतात शेतीमालाचे दर कोसळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. सदर करार शेतकऱ्यांसाठी असमान स्पर्धा निर्माण करणारा असून या करारामुळे कृषी उत्पन्न बाजार समिती व्यवस्था व हमी भाव यांची उपयुक्तता कमी होईल. व्यापारी देखील स्थानिक शेतकऱ्यांकडून शेतीमाल खरेदी करण्या ऐवजी आयात केलेल्या उत्पादनांना प्राधान्य देतील. यामुळे स्थानिक बाजारपेठेचे अस्तित्व धोक्यात येणार असल्याची भिती व्यक्त करण्यात आली आहे. या सोबतच दुग्ध व्यवसायावरही या कराराचा गंभीर परिणाम होणार आहे. शेतीमालाचे दर कोसळल्यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था कोसळणार असून यामुळे भारतीय शेतकरी त्यांच्याच जमीनीवर मजूर म्हणून काम करतांनाचे चित्र दिसेल. या सर्व बाबींचा विचार करता सदर करार रद्द करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत केंद्र शासनाकडे पाठविण्यात आले आहे.
Source link
शेतकरी विरोधी व्यापार करार रद्द करा:स्वस्त विदेशी शेतीमालामुळे देशांतर्गत बाजारपेठ धोक्यात, हिंगोलीत काँग्रेसच्या वतीने धरणे आंदोलन