![]()
पुणे येथील सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ पार पडला. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (AI) युगात तरुणांनी करुणा, नैतिकता आणि मानवी मूल्ये जपून नेतृत्व करावे. सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठातर्फे लवळे, पुणे येथे शनिवारी या पदवीदान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. राज्यपाल जिष्णू देव वर्मा प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते, तर मुंबईतील फ्रान्सचे कॉन्सुल जनरल पॅट्रिक लेव्हेरिनो विशेष अतिथी होते. सिंबायोसिसचे संस्थापक व कुलपती प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार यांनी समारंभाचे अध्यक्षस्थान भूषवले. राज्यपाल वर्मा यांनी ‘वसुधैव कुटुंबकम’ या संकल्पनेवर भर दिला. हे केवळ एक घोषवाक्य नसून विकसित भारताचा मूलभूत विचार आहे. महाउपनिषदातून आलेली ही संकल्पना भारताने कोविड काळात अनेक देशांना लस पुरवून प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली, असे त्यांनी नमूद केले. एआयच्या युगात विद्यार्थ्यांनी केवळ तांत्रिक कौशल्येच नव्हे, तर करुणा, नैतिकता आणि सामाजिक जबाबदारीलाही तितकेच महत्त्व द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. नेतृत्व म्हणजे केवळ राजकीय पद नव्हे, तर प्रत्येक व्यक्ती आपल्या कार्यातून नेतृत्व सिद्ध करू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले. फ्रान्सचे कॉन्सुल जनरल पॅट्रिक लेव्हेरिनो यांनी आपल्या भाषणात सांगितले की, फ्रान्स आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारी ‘होरायझन २०४७’ या रोडमॅपद्वारे मजबूत केली जात आहे. सुरक्षा, शाश्वत विकास आणि लोकांमधील शैक्षणिक-सांस्कृतिक देवाणघेवाण या तीन प्रमुख क्षेत्रांवर दोन्ही देश एकत्रितपणे काम करत आहेत. वर्ष २०२६ हे ‘भारत-फ्रान्स नाविन्यता वर्ष’ म्हणून साजरे केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. प्रा. (डॉ.) शां. ब. मुजुमदार यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून सांगितले की, भारतात उच्च शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी केवळ पदवीच नव्हे, तर विविध संस्कृतींचा अनुभव आणि भारताच्या लोकशाही, संस्कृती व मूल्यांची शिदोरी सोबत घेऊन जावी. सिंबायोसिसमधून बाहेर पडणारा प्रत्येक विद्यार्थी जागतिक नागरिक आणि भविष्यातील जागतिक नेता आहे, असेही ते म्हणाले. यावेळी सिंबायोसिसच्या प्रधान संचालिका व प्र-कुलपती डॉ. विद्या येरवडेकर यांनी स्वागतपर भाषण केले, तर सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रामकृष्णन रमण यांनी आभार प्रदर्शन केले.
Source link
सिंबायोसिस विद्यापीठात आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ:राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचे एआय युगावर मार्गदर्शन