राज्यात 28 तारखेला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (TET) पेपर फोडणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य रॅकेटचा भिवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी कोनगाव पोलिसांनी धडक कारवाई करत तीन आरोपींना रंगेहाथ बेड्या ठोकल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, या प
.
कारवाई कशी झाली? परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त (DCP) पवन बनसोड यांना गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली होती की, उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेचे पेपर विकण्यासाठी काही लोक भिवंडीत येणार आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कोनगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत सकाळी ११ वाजेच्या सुमारास सापळा रचला. यावेळी तिथे पेपर विकण्यासाठी आलेल्या तिघांना पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले.
शिक्षण विभागाकडून खात्री आणि दीड कोटींची ‘डील’
आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे ४ सेट आढळून आले. पोलिसांनी तात्काळ शिक्षण विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून हे पेपर पडताळून पाहिले. शिक्षण विभागाने त्यांच्या कार्यपद्धतीनुसार (SOP) खात्री करत, जप्त करण्यात आलेले हेच मूळ पेपर असल्याचे स्पष्ट केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या पेपर विक्रीसाठी आरोपींनी तब्बल 1.5 कोटी (दीड कोटी) रुपयांची आगाऊ (ॲडव्हान्स) मागणी केली होती. हे पेपर पुढे विविध रकमांमध्ये परीक्षार्थी उमेदवारांना (कॅंडिडेट्स) विकले जाणार होते. आरोपींकडून प्रश्नपत्रिकेचे 4 सेट, मोबाईल फोन, डेबिट आणि क्रेडिट कार्ड जप्त करण्यात आले आहेत.
आरोपी परराज्यांतील; दिल्लीचे कनेक्शन
अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी परराज्यातील आहेत. यातील एक आरोपी हरियाणाचा तर दोन आरोपी बिहार राज्यातील आहेत. हे तिघेही दिल्लीवरून पेपर घेऊन भिवंडीत आले होते. एका आरोपीने यापूर्वी केंद्रीय विद्यालयात नोकरी लावण्यासाठी दुसऱ्या एका व्यक्तीला पैसे दिल्याची प्राथमिक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. हे आरोपी स्वतः पूर्वी परीक्षा देऊन नापास झाले आहेत.
तपासासाठी ‘SIT’ ची स्थापना
प्रकरणाचे गांभीर्य आणि यामागील मोठी टोळी असण्याची शक्यता लक्षात घेता, वरिष्ठांच्या आदेशाने एका विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना करण्यात आली आहे. या पथकाचे प्रमुख म्हणून DCP पवन बनसोड काम पाहतील. त्यांच्या पथकात 2 ACP, 9 अधिकारी (PI, API, PSI) आणि 20 पोलीस कर्मचारी असणार आहेत. या रॅकेटची मुळे शोधण्यासाठी पोलिसांची विविध पथके वेगवेगळ्या राज्यांत रवाना झाली आहेत. पेपर दिल्लीतून कसा आला, यात शिक्षण विभागातील कोणाचा सहभाग आहे का, आणि हे पेपर आणखी कोणाला विकले गेले आहेत का, या सर्व अंगांनी पोलीस आता सखोल तपास करत आहेत.
संबंधित बातम्या वाचा…
TETचा पेपर फुटला, उद्या होणारी परीक्षा रद्द: भिवंडीत प्रश्नपत्रिका विकणारे 3 जण ताब्यात; परीक्षा परिषदेचा निर्णय- फेरपरीक्षेसाठी पुन्हा शुल्क नाही

राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पुन्हा एकदा पेपरफुटीच्या वादात अडकली आहे. ठाणे जिल्ह्यात उद्या होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका आधीच बाहेर आल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर मोठी कारवाई करण्यात आली. या पार्श्वभूमीवर उद्या होणारी परीक्षा स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली असून, शिक्षण विभागाकडून याबाबत अधिकृत आदेश जाहीर होण्याची शक्यता आहे. ठाणे जिल्ह्यातून पेपरफुटी झाल्याची माहिती समोर आली असून, या प्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यामुळे देशभरात नीट (NEET) परीक्षा पेपरफुटी प्रकरणानंतर आता आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथे वाचा सविस्तर बातमी
TET पेपरफुटीनंतर सरकारचा मोठा दिलासा: फेरपरीक्षेसाठी पुन्हा शुल्क भरावे लागणार नाहीत, नव्याने नोंदणीचीही गरज नाही; 2-3 दिवसांत नव्या तारखेची घोषणा

परीक्षा परिषदेच्या उपायुक्त प्रिया शिंदे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, या प्रकरणात उमेदवारांची कोणतीही चूक नाही. त्यामुळे ज्यांनी आधीच नोंदणी केली आहे, त्यांना पुन्हा नोंदणी करण्याची गरज नाही. कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले जाणार नाही. परीक्षेची नवी तारीख दोन ते तीन दिवसांत जाहीर केली जाईल. त्यांनी सांगितले की, ही परीक्षा पुन्हा घेण्यासाठी नियोजनाची सुमारे तीन आठवड्यांची प्रक्रिया असते. चौकशी पूर्ण झाल्यानंतर दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. येथे वाचा संपूर्ण बातमी