![]()
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेत बंद दाराआड चर्चा केली. या भेटीत काँग्रेसने बारामतीतून उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी संवाद झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, काँग्रेसने आकाश मोरे यांना उमेदवारी जाहीर करून निवडणूक लढवण्याचा निर्धार आधीच स्पष्ट केला आहे. या चर्चेदरम्यान रोहित पवार यांनी पार्थ पवार यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबत दिलगिरी व्यक्त केल्याचेही सांगितले. पार्थ पवारांच्या वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये काही प्रमाणात असंतोष निर्माण झाला होता. तसेच, अजितदादांना न्याय द्या, असा संदेश काँग्रेसकडून देण्यात आल्याचेही समजते. या भेटीत रोहित पवार यांचा काँग्रेसचे प्रभारी नेते चेन्नीथला यांच्यासोबतही संवाद झाला, ज्यामुळे या चर्चेला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. निवडणुकीकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहायला हवे बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, याच पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी सपकाळ यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी काँग्रेसने बारामतीतून माघार घ्यावी, अशी विनंती केली. विशेष म्हणजे या चर्चेदरम्यान त्यांनी व्हिडीओ कॉलद्वारे काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याशीही संवाद साधला. बंद दाराआड झालेल्या या बैठकीत रोहित पवार यांनी अजितदादांसारखा मोठा नेता गेल्यानंतर या निवडणुकीकडे भावनिक दृष्टिकोनातून पाहायला हवे, असे मत मांडले. अजित पवार प्रकरणात योग्य तपास व्हायला हवा दरम्यान, काँग्रेसने मात्र आपली भूमिका स्पष्ट केली आहे. अजित पवार प्रकरणात योग्य ती कारवाई आणि तपास व्हायला हवा, असा मुद्दा काँग्रेसकडून मांडण्यात आला आहे. एवढा मोठा नेता गेल्यानंतर जर योग्य तपास होत नसेल, तर सामान्य नागरिकांना न्याय कसा मिळणार? असा सवाल काँग्रेसने उपस्थित केला आहे. त्यामुळेच त्यांनी आकाश मोरे यांना उमेदवारी दिल्याचे रोहित पवार यांनी सांगितले. पार्थ पवारांच्या वतीने दिलगिरी तसेच काँग्रेस हा स्वतंत्र विचारांचा पक्ष असल्याचे नमूद करत रोहित पवार यांनी पुन्हा एकदा माघारीची विनंती केली आहे. कुटुंबातील सदस्य आणि दादांचा कार्यकर्ता म्हणून मी ही विनंती करत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पार्थ पवार यांच्या अलीकडील वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या नाराजीबाबतही रोहित पवार यांनी दिलगिरी व्यक्त केली. ते विधान चुकीचे होते, आता सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. आता अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी काँग्रेस काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता 47 उमेदवार रिंगणात शिल्लक दरम्यान, बारामती पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस जवळ आला असून, काँग्रेसने माघार न घेण्याची ठाम भूमिका घेतल्यामुळे निवडणूक होण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. या पार्श्वभूमीवर आज बारामतीत सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले आहेत. सुरुवातीला वैध ठरलेल्या 53 अर्जांपैकी आता 47 उमेदवार रिंगणात शिल्लक राहिले आहेत. मात्र अंतिम आकडेवारी सायंकाळनंतर स्पष्ट होणार असून, शेवटच्या दिवशी आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राहुरी पोटनिवडणुकीतही माघारीच्या प्रक्रियेला वेग दुसरीकडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीतही माघारीच्या प्रक्रियेला वेग आला आहे. दुसऱ्या दिवशी चार उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्याने आता 18 उमेदवार रिंगणात राहिले आहेत. या मतदारसंघात भाजप-महायुतीचे अक्षय कर्डिले आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे गोविंदराव मोकाटे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता दिसत आहे. राहुरीत शिवसेना शिंदे गटाच्या काही पदाधिकाऱ्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले असून, तसेच ठाकरे गटाचे जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्या उमेदवारीबाबतही उत्सुकता आहे. अर्ज माघारीचा शेवटचा दिवस असल्याने बारामती आणि राहुरी या दोन्ही मतदारसंघांत मोठे राजकीय निर्णय आणि अनपेक्षित घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष आता या शेवटच्या टप्प्याकडे लागले आहे.
Source link
रोहित पवारांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी बंद दाराआड चर्चा:बारामतीत काँग्रेस ठाम, शेवटच्या दिवसाकडे सर्वांचे लक्ष