Headlines

चांदूर रेल्वे-कुऱ्हा पर्यायी रस्ता अरुंद:वाहतूक कोंडीची समस्या, अपघातांचा धोका; धुळीमुळे नागरिकांना त्रास




चांदूर रेल्वे ते कुऱ्हा दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे वाहनधारक आणि प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. कामासाठी देण्यात आलेला पर्यायी रस्ता अत्यंत अरुंद असल्याने वाहतूक कोंडी आणि अपघातांचे प्रमाण वाढले आहे. रस्त्याच्या एका बाजूने खोदकाम सुरू असून दुसऱ्या बाजूने वाहतूक वळवण्यात आली आहे. मात्र, हा पर्यायी मार्ग इतका अरुंद आहे की, दोन मोठी वाहने समोरासमोर आल्यास वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून प्रवाशांचा वेळ आणि इंधन वाया जात आहे. या समस्येचे एक उदाहरण २१ मे रोजी रात्री साडेआठ वाजता आमला गावाजवळ पाहायला मिळाले. कुऱ्हा येथून चांदूर रेल्वेकडे येणारी बस आणि तिच्यामागे असलेली पोलीस व्हॅन समोरून येणाऱ्या ट्रकमध्ये अडकली. अरुंद मार्गामुळे कोणतीही गाडी पुढे सरकू शकली नाही. सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प होती. अखेर पोलीस व्हॅनला मार्ग दिल्यानंतर, बसमधील १५ ते २० प्रवाशांना खाली उतरवून बस थोडी मागे घेतल्यावर वाहतूक सुरळीत झाली. या घटनेमुळे रस्त्याच्या कामातील नियोजनाचा अभाव पुन्हा एकदा समोर आला आहे. रस्त्याच्या कामामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ उडत आहे. यामुळे दुचाकीस्वार, प्रवासी आणि स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. धुळीमुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होत असून, वाहनचालकांना समोरचे नीट दिसत नसल्याने अपघाताचा धोकाही वाढला आहे. या पार्श्वभूमीवर, परिसरातील नागरिकांनी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे तातडीने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. पर्यायी मार्ग रुंद करण्याचे निर्देश कंत्राटदाराला द्यावेत, नियमित पाणी मारून धूळ नियंत्रणात ठेवावी, कामाचा दर्जा उत्तम राखावा आणि काम लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *