![]()
गोवंश तस्करी रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या बजरंग दलाच्या एका कार्यकर्त्याची तस्करांनी दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री घडली. गजानन मारोती सुरोशे (रा. वडद-मुडाणा, ता. महागाव) असे या मृत गोरक्षकाचे नाव असून या घटनेमुळे यवतमाळ जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी वेगाने कारवाई करत दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे. नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एका बोलेरो पिकअप वाहनातून (एमएच-२९-बीई-८९१५ गोवंशाची कत्तलीसाठी तस्करी केली जात असल्याची माहिती बजरंग दलाला मिळाली होती. त्याआधारे गजानन सुरोशे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बिजोरा टोल नाक्यावर सापळा रचला. तस्करांचे वाहन दिसताच गजानन यांनी त्यांच्या कारने (एमएच-१२-पीटी-८६३४) पाठलाग सुरू केला. मात्र, तस्करांनी वाहन उमरखेडपासून ५ किलोमीटर अंतरावरील सुकळी (ज.) गावाच्या दिशेने वळवले. तिथे आधीच दबा धरून बसलेल्या तस्करांच्या टोळीने गजानन यांच्या कारला वेढा घातला. त्यांना गाडीबाहेर ओढून दगड आणि लाकडी दांडक्यांनी मारहाण केली. ग्रामस्थ गजानन यांना रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या क्रूर हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. तस्करीचे मोठे रॅकेट आणि पूर्वनियोजित कट नागपूर-तुळजापूर महामार्गावरून दररोज रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणावर गोवंशाची अवैध वाहतूक चालते. यामागे एक मोठी संघटित आणि क्रूर टोळी सक्रिय असल्याची माहिती पुढे येत आहे. या प्रकरणात तस्करांनी पाठलाग करताना सुकळी गावाकडे जाणीवपूर्वक गाडी वळवणे आणि तिथे आधीच जमावाने तयार राहून हल्ला करणे, यावरून हा अचानक झालेला हल्ला नसून पूर्वनियोजित कट असल्याचा थेट आरोप बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. आरोपींच्या शोधासाठी हैदराबाद, नांदेड, हिंगोलीत पथक रवाना या प्रकरणी मृताचा भाऊ ज्ञानेश्वर सुरोशे यांच्या तक्रारीवरून मुख्य आरोपी शेख सुलतान अलावली (रा. सुकळी ज.) आणि इतरांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९ (१), १०३ (१), ३ (५) अन्वये हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार आरोपींच्या शोधासाठी हैदराबाद, नांदेड, हिंगोली आणि परभणी येथे पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
Source link
उमरखेडला बजरंग दल कार्यकर्त्याची गोवंश तस्करांकडून दगडाने ठेचून हत्या:तस्करांचा रक्तरंजित थरार सीसीटीव्हीत कैद; 2 संशयित ताब्यात