Headlines

SIR गांभीर्याने घ्या, अन्यथा महाराष्ट्राचा बंगाल होईल:आदित्य ठाकरे यांचा इशारा; बूथ लेव्हल एजंटची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दीष्ट




निवडणूक आयोगाने मतदार याद्या अद्ययावत करण्यासाठी राबवण्यात येणारी SIR प्रक्रियेसंदर्भात कुणीही गाफील राहू नका. अन्यथा महाराष्ट्रातही इतर राज्यांसारखीच परिस्थिती निर्माण होऊ शकते, असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे. निवडणूक आयोगाकडून सध्या मतदार यादी पडताळणी मोहीम राबवली जात आहे. पश्चिम बंगाल बिहार सारख्या राज्यात या प्रक्रियेत हजारो मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना उपरोक्त इशारा दिला आहे. आदित्य ठाकरे यांनी सोमवारी रात्री दादर येथील शिवसेना भवनात मुंबईतील आपल्या पक्षाचे नगरसेवक, माजी नगरसेवक, विभागप्रमुख व शाखा प्रमुखांची एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी त्यांना एसआयआरच्या मुद्यावर गाफील न राहण्याचे आवाहन केले. नेमके काय म्हणाले आदित्य ठाकरे? आदित्य ठाकरे म्हणाले, एसआयआर प्रक्रिया अत्यंत गांभीर्याने घेण्याची गरज आहे. या प्रकरणी कुणीही गाफील राहू नका. अन्यथा महाराष्ट्रातही इतर राज्यांसारखीच परिस्थिती निर्माण होईल. बिहार व पश्चिम बंगाल या दोन राज्यांत एसआयआर प्रक्रियेसाठी खूप कमी वेळ मिळाला होता. पण महाराष्ट्रात तशी परिस्थिती नाही. आपल्याकडे पुरेसा वेळ उपलब्ध आहे. त्यामुळे या कामात कोणतीही कसर सोडू नका. निवडणुकांना अद्याप 3 वर्षांचा कालावधी बाकी आहे. पण स्थानिक पातळीवर एसआयआर प्रक्रियेला सुरुवात होईल तेव्हा प्रत्येक पदाधिकाऱ्याने त्यात प्रत्यक्ष लक्ष घालून काम करण्याची गरज आहे, असे ते म्हणाले. बूथ लेव्हल एजंटची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दीष्ट उल्लेखनीय बाब म्हणजे ठाकरे गटाने आपल्या रणनीतीचा भाग म्हणून 1 जून ते 10 जून या कालावधीत बीएलए अर्थात बूथ लेव्हल एजंट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. प्रत्येक मतदार यादीसाठी बीएलए नेमणे सक्तीचे आहे. त्यामुळे आदित्य यांनी मुंबईतील सर्व शाखाप्रमुखांना अधिकाधिक नोंदणी करून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. परिणामी, ठाकरे गटाने एसआयआरच्या माध्यमातून मतांची होणारी संभाव्य छेडछाड रोखण्यासाठी कठोर भूमिका घेतल्याचे स्पष्ट होत आहे. व्यक्ती सुज्ञ मनाचा असेल, तर त्याला तुरुंगात टाका दुसरीकडे, आदित्य ठाकरे यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यापीठ व 5 लाख लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प राबवण्याच्या प्रस्तावावरूनही सरकारवर टीका केली. वेडेपणा आणि स्वार्थाला खरंच काही सीमा नाही. ज्या माणसाने हा प्रस्ताव मांडला आहे, जर तो सुज्ञ मनाचा असेल, तर त्याला तुरुंगात टाकले पाहिजे. अन्यथा त्याला उपचारांची गरज आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात विद्यापीठ आणि 5 लाख लोकांसाठी गृहनिर्माण प्रकल्प उभारले जाऊ शकतात, असा प्रस्ताव मांडण्याचा विचारही कसा काय होऊ शकतो? पर्यावरणाची अशी हानी करण्याचा इतका हव्यास का? आपल्या पर्यावरणाबाबत हा कसला द्वेष? आम्हा मुंबईकरांना हे अजिबात नको! आमच्या जंगलांना हात लावू नका आणि आमचे शहर उद्ध्वस्त करू नका, असे ते म्हणाले होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *