![]()
अमरावती शहरातील राहाटगाव चौक, विद्युत नगर चौक, तपोवन चौक अशा मुख्य व गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या वाईन व बिअर शॉपींमुळे परिसरात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याचा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला आहे. या संदर्भात कायदेशीर कारवाई करावी व उपद्रवी प्रकारांना आळा घालावा, या मागणीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत यांच्या नेतृत्वात पोलीस आयुक्त कार्यालय तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यालयावर धडक देत निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केले आहे की, मुख्य चौकांमध्ये सुरू असलेल्या वाईन व बिअर शॉपींमुळे स्थानिक महिला, युवक, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. शॉपींमध्ये येणारे ग्राहक परिसरातच थांबून अनेकदा गोंधळ घालत असल्याने वाद-विवाद, होतात तसेच अश्लील संभाषणाचे प्रकार वारंवार घडत आहेत. काही ठिकाणी छेडछाडीच्या घटनाही घडत असल्याने स्थानिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर बनला आहे. तसेच, मुख्य चौकांमध्ये अशा प्रकारची दुकाने सुरू झाल्याने युवा पिढी व्यसनाधीनतेकडे वळत असून समाजावरही त्याचे दुष्परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे शहरातील प्रमुख चौकांतील वाईन व बिअर शॉपींवर तातडीने कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केली आहे. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मनपा नगरसेवक चंदू खेडकर, गुडू धर्माळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष ऋतुराज राऊत, आकाश हिवसे, अभिषेक हजारे, अभिमन्यू तायवाडे, प्रतीक डुकरे, प्रमोद धनाडे, बादल काळे, संकेत बोके, अमित तायडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पोलिस उपायुक्त श्याम घुगे यांना निवेदन देताना रायुकॉचे पदाधिकारी
Source link
मुख्य चौकातील वाईन शॉपी बंद करण्यात यावी:राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आयुक्तांना निवेदन