Headlines

मोठी बातमी:शरद पवारांचा एक फोन अन् पुण्यात उमेदवारी फायनल; विधान परिषदेसाठी श्रीकांत पाटील मैदानात, पवारांचा मास्टरस्ट्रोक




पुणे विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीत महत्त्वाच्या राजकीय हालचालींना वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाने अखेर आपला उमेदवार निश्चित केला आहे. पुणे शहराध्यक्ष श्रीकांत पाटील यांच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी स्वतः फोन करून श्रीकांत पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्याचं समजत आहे. त्यामुळे पुण्यातील विधान परिषद निवडणुकीत आता राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हं दिसत आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीकांत पाटील हे काही वेळातच आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून पुणे विधान परिषद जागेसाठी अनेक नावांची चर्चा सुरू होती. मात्र अखेर शरद पवार यांनी थेट हस्तक्षेप करत श्रीकांत पाटील यांच्या नावाला अंतिम मान्यता दिली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पुण्यात संघटनात्मक ताकदीवर भर देत स्थानिक नेतृत्वाला संधी दिल्याचं मानलं जात आहे. दरम्यान, महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर विधान परिषद जागावाटपाचं चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, 17 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत 15 जागांवर उमेदवार निश्चित झाले आहेत. फक्त नाशिक आणि नांदेड या 2 जागांवर अजून चर्चा सुरू असून तिन्ही पक्षांनी दावा कायम ठेवला आहे. उर्वरित जागांवर मात्र एकमत झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्यानुसार काँग्रेस 8 जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर ठाकरे गटाला रत्नागिरी, जळगाव, परभणी आणि हिंगोली या जागा देण्यात आल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुणे, ठाणे, सातारा आणि सांगली या जागांवर उमेदवार देणार आहे. त्यामुळे पुण्यातील लढत आता अधिक प्रतिष्ठेची मानली जात आहे. श्रीकांत पाटील यांच्या उमेदवारीमुळे पुण्यातील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. आघाडी आणि महायुती यांच्यात राजकीय चुरस रंगणार दुसरीकडे महायुतीतही जागावाटपाचा तिढा जवळपास सुटल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 17 पैकी 16 जागांवर महायुतीत जवळपास सहमती झाली असून त्यातील 10 जागा भाजप, 4 जागा शिवसेना आणि 2 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे. छत्रपती संभाजीनगर-जालना या जागेबाबत अजून चर्चा सुरू असून त्यावर अंतिम निर्णय लवकरच होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्यात जोरदार राजकीय चुरस रंगणार असल्याचं स्पष्ट होत आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *