![]()
केंद्रीय ऑनलाईन पद्धतीने सुरू असलेल्या अकरावी प्रवेशाची पहिली सर्वसाधारण यादी जाहीर झाली आहे. ज्या विद्यार्थ्यांना महाविद्यालये अलॉट झाली आहेत, त्यांना ३ जूनपर्यंत आपले प्रवेश निश्चित करावे लागणार आहेत. यापूर्वी शून्य फेरीअंतर्गत इनहाऊस कोटा, अल्पसंख्याक कोटा आणि व्यवस्थापन कोट्यासाठी प्रवेश प्रक्रिया राबवण्यात आली होती. या कोट्याशी संबंधित बहुतांश विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश यापूर्वीच निश्चित केले आहेत. जिल्ह्यात अकरावीसाठी एकूण ४३ हजार ११० जागा उपलब्ध आहेत. यामध्ये विज्ञान शाखेच्या सर्वाधिक १८ हजार ५७० जागा आहेत. कला शाखेसाठी १८ हजार ३०० आणि वाणिज्य शाखेसाठी ६ हजार २४० जागा आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाच्या भाग दोनमध्ये महाविद्यालयांचा पसंतीक्रम नोंदवला होता, त्यांना त्यांच्या पसंतीक्रमानुसार मिळालेल्या महाविद्यालयांची यादी २९ मे रोजी जाहीर करण्यात आली. या विद्यार्थ्यांना ३ जूनपर्यंत संबंधित महाविद्यालयांमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करण्याची मुदत देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील एकूण जागांपैकी ५ हजार ८०० जागा अल्पसंख्याक कोट्यासाठी, ३ हजार ७८९ जागा इनहाऊस कोट्यासाठी आणि २ हजार ५४ जागा व्यवस्थापन कोट्यासाठी राखीव होत्या. यापैकी बहुतांश जागांचे प्रवेश शून्य फेरीमध्येच पूर्ण झाले आहेत. जिल्ह्यात सर्व शाखा मिळून एकूण ३३९ महाविद्यालये आहेत. दरम्यान, रविवार हा सुटीचा दिवस असला तरी प्रवेश प्रक्रियेचे कामकाज सुरू राहणार आहे. विद्यार्थी आणि पालकांची गैरसोय टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांना प्रवेश विभाग सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
Source link
अकरावी प्रवेशाची पहिली यादी जाहीर:विद्यार्थ्यांना 3 जूनपर्यंत प्रवेश निश्चित करण्याची मुदत