Headlines

एकनाथ शिंदे – ठाकरे गटाच्या खासदारांची गुप्त बैठक:ऑपरेशन टायगरवरून राजकारण पेटले; अरविंद सावंतांनी बैठकीचे वृत्त फेटाळले




महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या ऑपरेशन टायगर या चर्चेमुळे मोठी खळबळ उडाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील आठ खासदारांसोबत गुप्त बैठक घेतल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीनंतर हे खासदार शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना जोर आला आहे. या घडामोडींमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून विविध स्तरांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. या कथित आठ खासदारांमध्ये खासदार अरविंद सावंत यांचे नावही समाविष्ट असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे राजकीय वर्तुळात अधिकच खळबळ उडाली. सावंत हे ठाकरे गटातील महत्त्वाचे आणि अनुभवी नेते मानले जात असल्याने त्यांच्या नावाचा उल्लेख झाल्याने या चर्चेला अधिक वजन मिळाले. मात्र, ही माहिती समोर येताच सावंत यांनी तातडीने पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पत्रकार परिषदेत बोलताना अरविंद सावंत यांनी या सर्व बातम्यांचा तीव्र शब्दांत निषेध नोंदवला. मी सध्या रागातही आहे आणि मला कीवही येते, अशा शब्दांत त्यांनी आपली भावना व्यक्त केली. सकाळी अचानक ही बातमी पाहून धक्का बसल्याचे सांगत त्यांनी स्पष्ट केले की, कालपर्यंत इतर खासदारांची नावे घेतली जात होती, मात्र आज अचानक त्यांच्या नावाचाही समावेश करण्यात आला आहे. सावंत यांनी स्पष्टपणे सांगितले की, शिंदे यांच्यासोबत आम्ही जाणार आहोत, ही बातमी पूर्णपणे खोटी आहे. अशा प्रकारच्या अफवा पसरवून जनतेची दिशाभूल केली जात आहे. त्यांनी या प्रकाराला कडाडून विरोध दर्शवत अशा बातम्या पसरवणाऱ्यांवर टीका केली. त्यांच्या मते, केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील जनतेनेही अशा खोट्या बातम्यांबाबत सतर्क राहण्याची गरज आहे. सावंत यांनी भूमिका स्पष्ट केली मी बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यांच्या एका फोनवर मी मंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे त्यांना सोडण्याचा प्रश्नच येत नाही. कोणत्याही परिस्थितीत मी मातोश्रीशी प्रतारणा करणार नाही. आम्ही विकले जाणारे नाही. भगवा घेऊन आलो आहोत आणि भगव्यातच जाणार आहोत, असे म्हणत सावंतांनी आपली निष्ठा पुन्हा अधोरेखित केली. विकली जाणारी आणि विकत घेणारी माणसं कोण, हे लोकांनी ओळखलं पाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. तसेच, पन्नास खोके एकदम ओके, या विधानाचा उल्लेख करत त्यांनी काही नेत्यांवर अप्रत्यक्ष टीका केली. मी आयुष्यभर निष्ठावंत राहिलो आहे. माझ्याविरोधात खोटी बातमी छापून माझ्या प्रतिमेला धक्का दिला आहे. त्यामुळे संबंधितांवर अब्रुनुकसानीचा दावा करणार,” असे त्यांनी सांगितले. पत्रकार परिषदेतच पत्र लिहिले सावंत यांनी पत्रकार परिषदेत एक पत्र लिहित आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रातून त्यांनी आपल्या राजकीय प्रवासातील निष्ठा आणि भूमिका पुन्हा एकदा अधोरेखित केली. या पत्रात सावंत यांनी भावनिक शब्दांत आपली बांधिलकी व्यक्त केली आहे. मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा निष्ठावंत सैनिक आहे. मला काहीही झालं तरी मातोश्रीशी असलेलं नातं तोडणार नाही. पक्षाशी बेईमानी करणं म्हणजे आईच्या दुधाशी प्रतारणा करण्यासारखं आहे, असे त्यांनी लिहिले. तसेच, माझ्याबाबत पसरवल्या जाणाऱ्या अफवा पूर्णपणे चुकीच्या आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे. राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे राज्यातील राजकीय समीकरणे बदलणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली असली तरी ठाकरे गटातील नेत्यांनी मात्र एकमुखाने या दाव्यांना फेटाळले आहे. कोणतीही फूट पडणार नसल्याचा दावा पुन्हा एकदा पुढे आला आहे. त्यामुळे या चर्चांमागे नेमकं काय आहे, याबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. एकूणच, ऑपरेशन टायगर मुळे निर्माण झालेल्या राजकीय वातावरणात आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. अरविंद सावंत यांच्या स्पष्ट भूमिकेमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. येत्या काळात या चर्चांचा नेमका परिणाम काय होतो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *