![]()
येथून जवळच असलेल्या बोरगाव मंजू पोलिस ठाण्याच्या हद्दीतील यावलखेड येथे गुरुवारी सकाळी घडलेल्या धक्कादायक घटनेत पतीने कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला करून तिची हत्या केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, दोन लहान मुलांचे मातृछत्र हरपले आहे. शहरातील डाबकीरोड पोलिस ठाणे हद्दीत अन्नपूर्णामाता मंदिर परिसरात पतीने पत्नीचा खून करुन जाळून टाकण्याची घटना ताजी असतानाच गेल्या तीन दिवसांत कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या करण्याची गुरुवारी घडलेलीही दुसरी घटना आहे. यामुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत दीपक लक्ष्मण पिंजरकर यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मृत महिलेचे नाव वृषाली अनिल निंबोकार (32),रा. गजानन नगर यावलखेड, ता. अकोला असून,ती यावलखेड येथील गायत्री ऑर्गेनिक प्रॉडक्ट्स कंपनीत कामाला होती. पती अनिल निंबोकार (42), सासरे व प्रथमेश उर्फ समर्थ व कार्तिक या दोन मुलांसह गायत्री ऑरगॅनिक प्रॉडक्ट्स कंपनीच्या समोरील बाजूच्या गजानन नगर, यावलखेडमध्येच मागील दोन वर्षांपासून राहत होते. वृषाली व अनिल निंबोकार यापती-पत्नीमध्ये नेहमीच कौटुंबिकवाद होत असत. गुरुवारी सकाळी सुमारे 9.15 ते 9.30 च्या सुमारासपती मोठा मुलगा समर्थ याला मारत होते. ‘मुलाला मारू नका म्हणून आईमध्ये पडली त्यामुळे पतीचा राग अनावर झाला. या वादाचे रूपांतर हिंसाचारात झाले आणि अनिल निंबोकार याने वृषालीवर चाकूने सपासप वार केले. घटनेदरम्यान घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून आत प्रवेश केला आणि त्यांनी आरोपीला साडीने बांधून ताब्यात ठेवण्यात आले. जखमी अवस्थेतील वृषालीला तातडीने येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी अंती तिला मृत घोषित केले. याप्रकरणी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी अनिल निंबोकार (42) यास अटक केली आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शंकर शेळके यांच्यासह बोरगाव मंजूचे प्रभारी ठाणेदार पोलिस उपनिरीक्षक अजित जाधव, पोलिस उपनिरीक्षक मनोज उघडे, पोलिस उपनिरीक्षक रवींद्र धुळे, हेड कॉन्स्टेबल आकाश यादव, सुदिप राऊत, प्रशांत विधळे,अक्षय देशमुख, शिवहरी लांडगे तपास करत आहेत. या घटनेमुळे यावलखेड परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. आईला मारत असताना मुलगा होता रडत घरातून आरडाओरडा ऐकू येत असताना मोठा मुलगा प्रथमेश उर्फ समर्थ ‘बाबा आईला मारत आहेत’अशी हाक मारत बाहेर आला. शेजाऱ्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. दरवाजा उघडल्यानंतर वृषाली रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसली, तर अनिलच्या हातात चाकू होता.शेजाऱ्यांनी तत्काळ अनिलला पकडून त्याच्या हातातील चाकू काढून घेतला. त्याने त्यानंतर विषारी कीटकनाशक पिण्याचा प्रयत्न केला, मात्र उपस्थितांनी तो प्रयत्न हाणून पाडला. जिल्ह्यात आठवडाभरात गुन्हेगारी घटना वाढल्या शहरासह जिल्ह्यात सर्वच भागांमध्ये गुन्हेगारीने डोके वर काढले असून, गेल्या 1 ते 9 एप्रिल या नऊ दिवसांत जिल्ह्यात कौटुंबिक वादातून दोन खून, दोन जबर हाणामाऱ्या, एक आर्थिक फसवणूक, दोन महिला अत्याचाराच्या घटना घडल्या. बाळापूर पोलिस ठाणे हद्दीत 112 किलो गांजा सापडला. गेल्या आठवडाभरातील विविध प्रकारच्या घटना पाहता जिल्ह्याचा क्राइम रेट वाढल्याचे दिसून येत आहे. शहरातील गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असताना पुन्हा एकदा थरारक हत्याकांड उघडकीस आले आहे. अकोला शहरात गावगुंडांची वाढती दहशत, लहान सहान घटनांवरून निघणारे चाकू, सुरे पाहता तसेच गांजाच्या आहारी गेलेले अल्पवयीन गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नांग्या कायमच्या ठेचण्याची वेळ आली आहे. पोलिस प्रशासनाने या सर्व प्रकरणांची गंभीर दखल घेण्याची गरज निर्माण झाल्याचा सूर जनतेतून उमटत आहे.
Source link
अकोल्यात पत्नीचा चाकूने भोसकून खून; 2 चिमुकल्यांचे मातृछत्र हरपले:‘मुलाला मारू नका'' म्हणून आईमध्ये पडली अन् गेला जीव