![]()
महाराष्ट्रात ऑपरेशन टायगर सुरू असल्याची चर्चा असून यामुळे राज्याच्या राजकारणात मोठ्या उलथापालथी सुरू होतील असेही बोलले जात आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार शिवसेना शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचा दावा करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ठाकरेंच्या खासदारांची बैठक झाल्याचा दावाही केला गेला. मात्र हा दावा एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावला आहे. आता शिंदेगटाच्या मंत्र्यांनी मोठा दावा केला आहे. ते खासदार कधी ना कधी आमच्याकडे येतीलच, असा दावा मंत्री प्रतापराव जाधव यांनी केला आहे. मंत्री प्रतापराव जाधव म्हणाले, ठाकरे गटातील खासदार कधी ना आमच्याकडे येतीलच. तसेच या आधी प्रियंका चतुर्वेदी यांना खासदारकी दिल्यामुळे ठाकरेंचे खासदार आदित्य ठाकरेंवर नाराज होते, असा दावाही जाधव यांनी केला आहे. तसेच ते म्हणाले की ठाकरे गटाचे खासदारच नव्हे तर आमदारही अस्वस्थ आहेत. आमच्या तेव्हा काही तक्रारी होत्या, त्याच तक्रारी आज त्यांच्याकडील आमदार-खासदारांच्या आहेत, असे जाधव यांनी म्हटले आहे. पुढे बोलताना प्रतापराव जाधव म्हणाले, आम्हाला चांगली वागणूक मिळत नाही, आम्हाला कोणी विचारात नाही. लक्ष देत नाही, हे दुःख आमच्याकडे ते व्यक्त करतात. आमचे मित्रच आहेत ते सगळे. आता मुख्य नेते एकनाथ शिंदे ठरवतील तेव्हा पुढचे पाऊल उचलले जाईल. उद्धव ठाकरेंना आश्चर्य वाटेल असे लोक येतील आमचे मित्र आहेत दुःखी असतात. आम्ही त्यांना सांगतो, फार सहन करू नका. तुम्हाला स्वातंत्र्य आहे, तुमचे स्वागत आहे. कोण पाऊल पुढे टाकणार याची प्रत्येकजण वाट पाहतोय. हे कधी ना कधी होणार आहेच. पण उद्धव साहेबांना आश्चर्य वाटेल असे लोक आमच्याकडे येतील, असा दावाही प्रतापराव जाधव यांनी केला आहे. अशी कोणतीही बैठक झाली नाही- एकनाथ शिंदे दरम्यान, ठाकरेंच्या खासदारांची एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाल्याचे वृत्त एकनाथ शिंदे यांनी फेटाळून लावले आहे. ते म्हणाले की, अशी कोणतीही बैठक झालेली नाही. गेल्या दीड वर्षांपासून अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत. परंतु, या बातम्यांमध्ये काडीचेही तथ्य नाही. केवळ राजकीय गैरसमज आणि सनसनाटी निर्माण करण्यासाठी अशा वावड्या उठवल्या जात आहेत. अशी कोणतीही बैठक झाली नाही आणि त्या केवळ अफवा आहेत. अशा प्रकारचे वृत्त पूर्णपणे निराधार असून जनतेमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले आहे.
Source link
प्रियंका चतुर्वेदींच्या खासदारकीवरून आदित्य ठाकरेंवर नाराज:ते कधी ना कधी आमच्याकडे येतीलच, मंत्री प्रतापराव जाधव यांचा दावा