![]()
सिल्लोड तालुक्यातील वसई शिवारातील गट नंबर १८५ मधील सिमेंट बंधारा गेल्या दहा वर्षांपासून दगड, गोटे आणि गाळाने पूर्णपणे साचला आहे. पावसाळ्यात यात पाण्याचा एक थेंबही साचत नसल्याने, हा बंधारा परिसरातील शेतकऱ्यांसाठी ‘देखना’ ठरत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. बांधकाम विभागाकडून सुमारे १५ वर्षांपूर्वी या ठिकाणी सिमेंट काँक्रीट बंधारा उभारण्यात आला होता. मात्र, सुरुवातीची एक-दोन वर्षे कशीबशी बंधाऱ्याच्या बुडाला पाणी तुंबले. या बंधाऱ्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याच्या तक्रारी स्थानिक शेतकऱ्यांनी जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे केल्या होत्या. परंतु, संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केल्याचा आरोप होत आहे. सध्या प्रशासनाकडून जलसंधारणाच्या कामांचा मोठा डोलारा मिरवला जात असला, तरी प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. मातब्बर पुढाऱ्यांच्या वरदहस्तामुळे कंत्राटदारांनी ही कामे निकृष्ट दर्जाची केल्याची चर्चा परिसरात आहे. बंधाऱ्यातील गाळ, दगड-गोटे काढल्यास कामाचे पितळ उघडे पडेल, या भीतीने अधिकारी याकडे पाठ फिरवत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
Source link
15 वर्षांपूर्वीचा बंधारा, 10 वर्षांपासून कोरडाठाकच:वसई शिवारातील शेतकऱ्यांची होतेय गैरसोय