![]()
बिहारचे ऊस उद्योग मंत्री संजय कुमार पासवान यांनी महाराष्ट्रातील उद्योजक आणि गुंतवणूकदारांना बिहारमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन केले आहे. पुणे येथे आयोजित एका गुंतवणूकदार मेळाव्यात ते बोलत होते. बिहारमध्ये उद्योगांसाठी मुबलक कच्चा माल, पाणी आणि कष्टाळू शेतकरी उपलब्ध असल्याने गुंतवणुकीच्या प्रचंड संधी असल्याचे पासवान यांनी नमूद केले. हा मेळावा बिहार सरकार, पुण्यातील टू सिग्मा कंपनीचे संचालक चंद्रशेखर ओगले आणि तिरहुत उद्योगचे संचालक कल्पना बाजपेयी व हरेन्द्र कुमार बाजपेयी यांच्या वतीने रेसिडेन्सी क्लब येथे आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मंत्री पासवान म्हणाले, “मी केवळ बिहारचा प्रतिनिधी नव्हे, तर भारतीय सरकारचा प्रतिनिधी म्हणून आलो आहे. महाराष्ट्राने उद्योग जगतात देशात आणि परदेशात नाव उज्वल केले आहे. त्याच पद्धतीने आपले तंत्रज्ञान आणि आर्थिक गुंतवणूक वापरून बिहारलाही उद्योग जगतात प्रगती करण्यासाठी सहकार्य करावे.” ते पुढे म्हणाले की, बिहारमध्ये अपार औद्योगिक संधी आहेत. साखर उद्योगाप्रमाणेच इथेनॉल निर्मिती उद्योगातही प्रचंड क्षमता आहे, जो येणाऱ्या काळात देशाची ऊर्जेची गरज भागवण्यासाठी अत्यावश्यक आहे. बिहारचे ऊस उद्योग आयुक्त अनिल कुमार झा यांनी सांगितले की, चंपारणमध्ये महात्मा गांधींच्या यशस्वी आंदोलनानंतर ऊस शेती हा पर्याय पुढे आला आणि तेव्हापासून साखर उद्योगाने तिथे जोर धरला आहे. सध्या बिहारमध्ये साठ हजार टन साखर उत्पादन होत असून, येत्या पाच वर्षांत ते दोन लाख टीसीबीपर्यंत वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कार्यक्रमात अरुंधती पुरंदरे यांनी गुंतवणूक विषयावर मार्गदर्शन केले. मानसी नायडू यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. मेळाव्याच्या शेवटी पं. संजय गरूड यांच्या शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम सादर करण्यात आला.
Source link
बिहार मंत्र्यांचे महाराष्ट्रातील गुंतवणूकदारांना आवाहन:साखर आणि इथेनॉल उद्योगात गुंतवणुकीसाठी निमंत्रण