![]()
राज्यात आदिवासी बांधवांच्या जमिनी सर्रास लाटल्या जात आहेत. त्यांना मारहाण करून हक्काच्या घरातून बाहेर काढले जात असून, लोकांच्या मनातील कायद्याची भीतीच या सरकारने पूर्णपणे नाहीशी केली आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मिरा रोड परिसरातील आदिवासी जमिनी बेकायदेशीरपणे बळकावल्याप्रकरणी मूळ आदिवासी जमीनधारकांनी तक्रार केली होती. ठाण्याचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना एक अहवाल सादर केला आहे. या अधिकृत अहवालात भाजपचे स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आणि त्यांच्या मालकीची असलेल्या ‘सेव्हन इलेव्हन हॉटेल प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीवर थेट ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रश्नावर बोलताना आव्हाडांनी असे म्हटले आहे. खासदार संजय दिना पाटील यांच्या ‘बॉम्ब’ संदर्भातील वक्तव्यावर विचारले असता आव्हाड यांनी मिश्किल टिप्पणी केली. संजय दिना पाटील यांना कोण बॉम्ब आणून देणार आहे हे मला माहिती नाही. त्यांनी माझ्यासोबत काम केले आहे, पण त्यांच्याकडे बॉम्ब आहे हे मला ठाऊक नव्हते. बॉम्बबद्दल मला काही विचारूच नका; मी गांधीवादी माणूस आहे, बॉम्बचं नाव ऐकलं की मी घाबरून पळून जातो, असा टोला त्यांनी लगावला. हा अगदी ओपन भ्रष्टाचार ठाणे महानगरपालिकेतील 2800 कोटी रुपयांच्या भूखंड घोटाळ्यावर बोलताना आव्हाड म्हणाले की, हा अगदी ‘ओपन भ्रष्टाचार’ आहे. मूळ जमीन मालक कोर्टात 28 एकर जागा देण्यास तयार असल्याचे लिहून देतो. वन खाते सुरुवातीला ही जमीन द्यायला तयार नव्हते. मात्र, कायद्याच्या सेक्रेटरीने ती फाईलच लांबवून ठेवली. वन खाते जर योग्य वेळी सुप्रीम कोर्टात गेले असते, तर हा घोटाळा झाला नसता.या संपूर्ण प्रकरणात गणेश नाईक दोषी आहेत की निर्दोष, हे त्यांनी स्वतः स्पष्ट करावे; मात्र यामागच्या दोषी अधिकाऱ्यांवर कडक चौकशी लागली पाहिजे. ..तर मुंबई बुडाली नसती मुंबईत पहिल्याच पावसाने झालेल्या तुंबापुरीवरूनही जितेंद्र आव्हाड यांनी मनपा प्रशासनाला टोला लगावला. पावसाळ्यापूर्वी मुंबईच्या महापौरांनी स्वतः रस्त्यावर उतरून परिस्थितीचा प्रामाणिक आढावा घेतला असता, तर आज मुंबईमध्ये जागोजागी इतके पाणी साचले नसते आणि मुंबईकरांचे हाल झाले नसते, असे आव्हाड म्हणाले. दोन-तीन दिवसांतल्या हत्या बघून भीती वाटते जितेंद्र आव्हाड म्हणाले की, तुकाराम मुंडे यांच्या बदलीसाठी व्यावसायिक लॉबी सक्रिय आहेत. दुधाची, माव्याची, तांदळाची, फार्मास्युटिकल आणि सर्वात मोठी गुटख्याची लॉबी एकत्र येऊन करोडो रुपये जमा करत आहे. पुण्यातील लोहगड किल्ल्यावरील केतन अगरवाल हत्या प्रकरणाचा दाखला देत ते म्हणाले, “लोकांची डोकी फिरली आहेत का, हेच कळत नाही. दोन-तीन दिवसांतल्या हत्या बघून स्वतःलाच भीती वाटायला लागली आहे. लग्न ठरतं, तो मुलगा मुलीचे लाड करतो आणि ती मुलगी प्रियकराला बोलावून त्याची हत्या करते.
Source link
आदिवासींना मारून बाहेर काढलं जातंय, कायद्याची भीतीच उरलेली नाही:मी गांधीवादी माणूस, बॉम्बचं नाव ऐकलं की पळून जातो- जितेंद्र आव्हाड