Headlines

अधिकमासानिमित्त अनोखा उपक्रम:चोपड्यातून विठू माऊलीच्या दर्शनासाठी एकाच वेळी सुटल्या बसेस, 410 भाविक यात्रेसाठी रवाना




चोपडा शहर व तालुक्याच्या धार्मिक इतिहासात सुवर्णक्षण ठरावा असा उपक्रम शुक्रवारी सकाळी पार पडला. पंकज समूहाच्या वतीने तब्बल 410भाविकांना पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आरामदायी बसेसमधून रवाना करण्यात आले. चोपड्याच्या इतिहासात प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने भाविक एकत्रितपणे पंढरपूर यात्रेसाठी निघाल्याने हा उपक्रम विशेष ठरला. अधिकमासानिमित्त पंकज विद्यालयात पंकज समूहाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद्भागवत पारायण, सात दिवसांचा कीर्तन सप्ताह तसेच ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले होते. या धार्मिक कार्यक्रमांना मोठ्या संख्येने भाविकांनी प्रतिसाद दिला. त्याच वेळी भाविकांनी पंढरपूर दर्शनासाठी सामूहिक यात्रेचे आयोजन करण्याची विनंती डॉ. बोरोले यांच्याकडे केली होती. त्या विनंतीला प्रतिसाद देत पंकज समूहाने अवघ्या काही दिवसांत संपूर्ण नियोजन करून 410 भाविकांसाठी पंढरपूर यात्रेचे आयोजन केले. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पंकज विद्यालयाच्या प्रांगणात श्री गणेश ट्रॅव्हल्स, अडावद यांच्या आरामदायी बसेसचे विधिवत पूजन करण्यात आले. डॉ. सुरेश बोरोले, हेमलता बोरोले व दिपाली बोरोले यांच्या हस्ते श्रीफळ वाहून यात्रेला शुभारंभ करण्यात आला. यावेळी श्यामकांत पाटील, कवी रमेश जे. पाटील, माजी सरपंच पंडित पाटील, काशिनाथ महाजन, व्ही. आर. पाटील, एम. व्ही. पाटील यांच्यासह अनेक मान्यवर व माता-भगिनी उपस्थित होत्या. ही यात्रा शनिशिंगणापूर मार्गे पंढरपूरला जाणार असून 26 जून रोजी रात्री पंढरपूर येथे मुक्काम करण्यात येणार आहे. 27 जून रोजी सर्व भाविक विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत. तीन दिवसांच्या या यात्रेत चहा, नाश्ता, दोन्ही वेळचे जेवण, मुक्काम, प्रवास तसेच भाविकांच्या सर्व प्रकारच्या देखभालीची जबाबदारी पंकज समूहाने स्वीकारली आहे.या यात्रेत चोपडा शहरातील विविध कॉलनींसह तालुक्यातील अनेक गावांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. तसेच आडगाव ता चोपडा व धरणगाव तालुक्यातील साळवा येथील भाविकही मोठ्या संख्येने यात्रेत सहभागी झाले आहेत. डॉ. सुरेश बोरोले यांच्या नेतृत्वाखाली पंकज समूहाने गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व सेवाभावी उपक्रम सातत्याने राबविले आहेत. समाजोपयोगी कार्यक्रमांवर दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च करून समूहाने सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यामुळे या पंढरपूर यात्रेचे आयोजनही समाजात कौतुकाचा विषय ठरत आहे.

“चोपडा शहरातील नागरिकांनी आमच्यावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. त्या प्रेमाची परतफेड करण्याचा पंकज समूह सातत्याने प्रयत्न करत असतो. आमच्या कुटुंबातील स्नुषा प्रतिभा बोरोले यांचे १ मे रोजी केदारनाथ यात्रेदरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभावी या भावनेतून भागवत कथा, कीर्तन सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायणाचे आयोजन करण्यात आले. या धार्मिक सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी पंढरपूरला घेऊन जाण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करता येणार नाही. अशा सेवाभावी कार्याची प्रेरणा आणि बुद्धी भगवंतच देत असतो.” डॉ. सुरेश पंडित बोरोले, संस्थापक अध्यक्ष, पंकज समूह, चोपडा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *