![]()
शेवगाव-पाथर्डी राज्य मार्गावर, शेवगाव शहरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर वन विभागाने लाखो रुपये खर्चून उभारलेले वन पर्यटन केंद्र सध्या कमालीचे दुर्लक्षित झाले आहे. सुमारे पाच हेक्टर क्षेत्रात पसरलेला आणि तब्बल दीड कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला
.
निसर्गाची जपणूक व्हावी, पर्यटनाला चालना मिळावी आणि प्राण्यांसह दुर्मिळ वनस्पतींचे संवर्धन व्हावे, या उद्देशाने या केंद्राची निर्मिती करण्यात आली होती. मात्र, सध्या या ठिकाणी पर्यटन तर दूरच, पण साधा माणसांचा वावरही दिसत नाही. पाण्याचे योग्य नियोजन नसल्याने वन विभागाने लावलेली झाडे पाण्याअभावी करपून गेली आहेत. वन पर्यटनाच्या नावाखाली येथे केवळ सांगाडाच उरला असल्याचे विदारक चित्र आहे.
पाथर्डीचे तत्कालीन वनपरिक्षेत्र अधिकारी अरुण साबळे यांच्या कार्यकाळात हा प्रकल्प मंजूर होऊन त्याचे काम सुरू झाले होते. शासनाने दीड कोटींसारखा मोठा निधी दिला, मात्र या पर्यटन केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी अद्याप साधा पक्का रस्ताही तयार करण्यात आलेला नाही. पर्यटकांना मुख्य रस्त्यावरून वेड्या बाभळीच्या झाडीझुडपांतून वाट काढत जावे लागते.
कुठेही दिशादर्शक फलक नसल्याने हे पर्यटन केंद्र शोधताना पर्यटकांची मोठी कसरत होते.
गेल्या तीन वर्षांपासून हा प्रकल्प सुरू असल्याचे वन विभाग सांगत असला, तरी प्रत्यक्षात मात्र येथे शुकशुकाट असतो. या ठिकाणी देखभालीसाठी नियुक्त असलेले वनमजूर आर. एस. चितळे हे कर्तव्यावर हजर राहत नसल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या नागरिकांनी नेमकी दाद कुणाकडे मागायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. वन विभागाच्या या उदासीनतेमुळे कोट्यवधींचा निधी पाण्यात गेल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
अधिकारी प्रशिक्षणावर; जबाबदारी ढकलण्यात वन विभाग मग्न शेवगाव वन परिक्षेत्राचा कार्यभार असलेले संदीप एकशिंगे हे सध्या महिनाभराच्या दीर्घकालीन प्रशिक्षणासाठी चंद्रपूर येथे गेले आहेत. त्यामुळे या विभागाचा अतिरिक्त पदभार बबन मंचारे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. दरम्यान, गायब असलेल्या वनमजुराबाबत विचारणा केली असता, आता कुठे प्रशासनाला जाग आली असून संबंधिताचा शोध घेण्याची हालचाल सुरू झाली आहे.