![]()
अनेक दिवसांपासून पावसाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या मेळघाटातील बळीराजासाठी अखेर आनंदाची बातमी आली आहे. गुरुवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास धारणी तालुक्यात मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावत परिसराला चिंब भिजवले. कडक उन्हामुळे कोरडी पडलेली जमीन आणि पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी वर्ग या पावसामुळे सुखावला आहे. पहिल्या पावसाच्या सरींनी मेळघाटातील शेतशिवारात नवचैतन्य निर्माण झाले असून आता खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसला होता. बियाणे, खतांची तयारी करून पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांना आजच्या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आता शेतकरी बांधव शेतात उतरून मशागत आणि पेरणीच्या कामाला सुरुवात करणार आहेत. मेळघाटातील डोंगररांगा, जंगल परिसर आणि शेतजमिनींवर पडलेल्या पावसाच्या सरींमुळे निसर्गानेही जणू हिरवा शालू परिधान करण्याची तयारी सुरू केली आहे. मातीचा सुगंध, पावसाच्या सरी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हे दृश्य आज मेळघाटात पाहायला मिळाले. यंदाचा खरीप हंगाम चांगला जावा, भरघोस पीक यावे आणि बळीराजाच्या मेहनतीला यश मिळावे, अशी आशा आता मेळघाटातील प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. पावसाच्या आगमनाने गावागावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Source link
मेळघाटात पावसाचे आगमन; पेरणीच्या कामांनाही सुरुवात:बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद- परिसर चिंब भिजला