![]()
दोन दिवस विश्रांती घेतल्यानंतर राज्यात मान्सून पुन्हा एकदा रौद्र रूप धारण करणार आहे. हवामान विभागाने (IMD) मुंबई, ठाणे आणि पुण्यासहित राज्यातील २४ जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. शनिवार आणि रविवारी (२७ व २८ जून) कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा जोर सर्वाधिक असेल, असा अंदाज वर्तवून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे आणि मुंबईकरांना सज्ज राहण्याच्या सूचना गेल्या दोन दिवसांपासून मुंबई आणि पुण्यात पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून ढगाळ वातावरणामुळे तापमानात वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, रविवारपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार असून पुण्यासह रायगड, रत्नागिरी आणि अहिल्यानगरमध्ये जोरदार पाऊस हजेरी लावेल. तर मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह वादळी पावसाची दाट शक्यता आहे. जारकरवाडीत ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार मान्सून स्थिरावत असतानाच पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जारकरवाडी परिसरात ढगफुटीसदृश पावसाने मोठे संकट आणले आहे. या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याखाली गेली असून, खरीप हंगामासाठी तयार केलेली शेती अक्षरशः वाहून गेली आहे. पावसाअभावी चिंतेत असलेल्या बळीराजावर आता या अतिवृष्टीने दुहेरी संकट ओढवले असून, प्रशासनाने तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून केली जात आहे. या जिल्ह्यांना मिळाला ‘यलो अलर्ट’ ठाणे, मुंबई, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, अहिल्यानगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. अहिल्यानगर : 11 वर्षींतील जूनमधील सर्वात कमी पावसाचा फटका जिल्ह्यात मान्सून लांबल्याचा सर्वाधिक फटका यंदाच्या खरीप हंगामाला बसला आहे. जूनचे २६ दिवस उलटूनही जिल्ह्यात केवळ ४१.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याने खरीपाच्या पेरण्यांना अक्षरशः ब्रेक लागला आहे. जिल्ह्यातील ६ लाख ७४ हजार ४६१ हेक्टर पेरणीयोग्य क्षेत्रापैकी आतापर्यंत केवळ १९ हजार ४६८.९२ हेक्टरवर म्हणजेच अवघ्या २.८९ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. गेल्या ११ वर्षांतील हा जूनच्या २६ दिवसांतील सर्वात कमी पाऊस ठरला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून सक्रिय होतो. यंदा मात्र पहिला समाधानकारक मान्सूनचा पाऊस २२ जूनला झाला. त्यानंतरही सर्वदूर पाऊस न झाल्याने जमिनीत आवश्यक ओल निर्माण झाली नाही. परिणामी बहुतांश शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून दमदार पावसाची प्रतीक्षा सुरू ठेवली आहे. गेल्या वर्षी परिस्थिती याच्या नेमकी उलट होती. मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे जमिनीत पुरेशी ओल निर्माण झाली होती. त्यामुळे २६ जूनअखेर सुमारे तीन लाख हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या पूर्ण झाल्या होत्या. यंदा मात्र पावसाने हुलकावणी दिल्याने हा वेग पूर्णपणे मंदावला आहे. संभाजीनगरात पावसाचा जोर वाढणार; आज वादळी वाऱ्यासह पाऊस शहरासह परिसरात मान्सून सक्रिय झाला असून, पावसाचा जोर आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २७ जून रोजी शहरात दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी शहराचे कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले. आगामी २८ जून ते २ जुलै या कालावधीत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, एक-दोन वेळा पावसाच्या सरी किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पारा ३४.६ अंशापर्यंत खाली शहराचे कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले. आगामी २८ जून ते २ जुलै या कालावधीत आकाश अंशतः ढगाळ राहणार असून, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामानातील बदलांचा अंदाज घेऊनच आपल्या दैनंदिन नियोजनाची आखणी करावी. हे ही वाचा.. MP – झारखंडमध्ये वादळ – विजांमुळे 16 जण ठार:उत्तराखंडमध्ये घर -शाळांत ढिगारा शिरला; UP, राजस्थान, हरियाणात तापमान 42°C+ देशातील 6 राज्ये उत्तराखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि हरियाणाच्या अनेक भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस सुरू आहे. मात्र, सहा राज्यांमध्ये तीव्र उष्णताही जाणवत आहे. उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणात पारा 42°C पेक्षा जास्त नोंदवला गेला. मध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये शुक्रवारी वीज कोसळून 4 लोकांचा मृत्यू झाला, तर आठ जण भाजले. देवासमध्ये वादळी वाऱ्यासह पावसामुळे घराच्या बाल्कनीचा काही भाग कोसळला, या अपघातात 2 महिलांचा मृत्यू झाला. सविस्तर वाचा
Source link
महाराष्ट्रात पुढील 48 तास महत्त्वाचे:पुणे, कोकणसह अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट, शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना