![]()
अकोला-अकोट व अकोट-शेगाव या दोन्ही महामार्गांचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. अंदुरा नजीक रस्त्याच्या मधोमध पडलेल्या भेगेत दुचाकीचे टायर फसल्याने अपघात झाला होता. यात या दोन निष्पाप युवकांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे याप्रकरणी कंत्राटदार व संबंध
.
अकोट- शेगाव मार्गावरील अंदुरा फाट्याजवळ रस्त्यावर पडलेल्या मोठ्या भेगांमुळे अपघात झाला होता. कुणाल राजेश भोरे (२२) व श्रीकांत पुरुषोत्तम बायस्कर (२२) हे दोघे युवक अकोट शहरातील श्रीहरी हॉटेलच्या मागील परिसरात राहणारे होते. ते शेगाव येथे दर्शन करून दुचाकीने अकोटकडे परत येत होते. दरम्यान अकोट-शेगाव मार्गावरील अंदुरा फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीचा भीषण अपघात झाला होता. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठमोठ्या भेगा पडलेल्या आहेत. याच भेगांमधून दुचाकी घसरल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले. त्याचवेळी अकोटहून छत्रपती संभाजीनगरकडे जात असलेली चांदूरबाजार आगाराची एस. टी. बस समोरून येत होती. दुचाकीस्वार बसच्या चाकाखाली आल्याने दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दरम्यान याप्रकरणी कारवाईसाठी शिवसेनेने (उबाठा) जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख मुकेश मुरूमकर, उपजिल्हाप्रमुख दिलीप हरिश्चंद्र बोचे, माजी जि.प. सदस्य जगन निचळ, धीरज शिरसाट व मृतांचे नातेवाईक संतोष बायस्कर, सुदर्शन बायस्कर यांच्यासह अरुण लोणकर, दादाराव सोळुंके तसेच सोमेस इंगोले, यश चांदूरकर यांच्यासह शेकडो शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिवसेनेने प्रामुख्याने पाच मागण्या केल्या आहेत. कंत्राटदार व संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा तात्काळ दाखल करावा. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपयांची आर्थिक मदत त्वरित द्यावी. सन २०१७ पासून रखडलेल्या कामाची व निकृष्ट दर्जाची उच्चस्तरीय चौकशी करून अहवाल जनतेसमोर जाहीर करावा. दोन्ही मार्गावरील टोल प्लाजा त्वरित हटवावेत. रस्त्यांची दर्जेदार दुरुस्ती करून तातडीने वृक्षलागवड करावी, या मागण्यांचा समावेश आहे.
टोल वसुलीवर आक्षेप : अकोट-अकोला, अकोट-शेगाव हा मार्ग एकीकडे रस्ते मृत्यूचे सापळे बनले असताना, कोणतीही दुरुस्ती न करता अकोला-आकोट मार्गावर व निंबा फाटा, आकोट-शेगाव मार्गावर टोल वसुली सुरू करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. ही जनतेची थेट लूट आहे. टोल प्लाजा तात्काळ बंद करावेत. अन्यथा शिवसेना स्वतः ते काढून टाकेल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
अकोला-अकोट व अकोट-शेगाव हे रस्ते विधानसभेच्या अकोला पूर्व व अकोट मतदारसंघात येतात. या दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. या दोन्ही मार्गांवरून शिवसेना (उबाठा) सत्ताधारी भाजपला घेरण्याची एकही संधी सोडत नाही. अकोला-आकोट मार्गाच्या विस्तारीकरणाचे काम तर सन २०१७ पासून अत्यंत मंद गतीने सुरू आहे. ९ वर्षे उलटूनही ते अपूर्ण आहे. करारात दुतर्फा वृक्षलागवड बंधनकारक असतानाही झाडे लावण्यात आलेली नाहीत. खोदकामात काळी माती टाकल्याने संपूर्ण रस्त्याला मोठ्या भेगा पडल्या आहेत. आकोट-शेगाव मार्गावरून वर्षभर अनेक धार्मिक पालख्या व वारकऱ्यांचे जथे जातात. मात्र भाविकांना सावलीसाठी एकही वृक्ष उपलब्ध नाही. कोट्यवधी रुपये खर्च करूनही मूलभूत सुविधा देण्यात प्रशासन व कंत्राटदार अपयशी ठरले आहेत, असा आरोप विरोधकांनी केला.