![]()
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे नागरिक, विशेषतः महिला प्रचंड त्रस्त झाल्या आहेत. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी माजी आमदार वीरेंद्रभाऊ जगताप यांच्या नेतृत्वात आणि नगरसेविका कल्पना लांजेवार यांच्या पुढाकाराने महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. दरम्यान आंदोलनकर्त्यांचा कठोर बाणा लक्षात घेता महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन देत समस्या सोडवण्याचे मान्य केले. चांदूर रेल्वे शहरात आणि विशेषतः छत्रपती शिवाजी नगर भागात दिवस-रात्र कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय तासनतास वीज खंडित होत असल्याने सामान्य जनता, व्यापारी आणि विद्यार्थी कमालीचे त्रस्त झाले आहेत. अंधारामुळे घरगुती कामेही खोळंबली असून महिलांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. आंदोलनादरम्यान जगताप यांनी मोर्चातील महिला व त्रस्त जनतेच्यावतीने वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. महिलांचा वाढता रोष आणि वीरेंद्रभाऊ जगताप यांचा कडक इशारा पाहून वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अखेर नमते घेतले. शहरात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याची कारणे शोधून, येत्या तीन दिवसांच्या आत सर्व तांत्रिक समस्या निकाली काढण्यात येतील आणि वीज पुरवठा सुरळीत केला जाईल, असे लेखी आश्वासनही अधिकाऱ्यांनी आंदोलकांना दिले. आंदोलनात अमोल होले, अनिस भाई सौदागर, श्रीनिवास सूर्यवंशी, राजीव लांजेवार, प्रफुल्ल कोकाटे, रुपेश पुडके, सागर गरुड, सतपाल वरठे, रितेश शेळके, रोहित बाबर, राजश्री माने, आशा गरुड, पूजा यादव, सारिका हटवार सहभागी होते. …तर भविष्यात याहून तीव्र आंदोलन अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आगामी तीन दिवसात चांदूर रेल्वे शहरासह छत्रपती शिवाजी नगरमधील वीज समस्या सुटली नाही, तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडले जाणार आहे. तसा इशाराच महावितरणच्या अधिकाऱ्यांना देण्यात आला असून या आंदोलनाची सर्वस्वी जबाबदारी महावितरणची असेल, असेही बजावण्यात आले आहे.
Source link
वीज वितरण कंपनीवर काँग्रेसचा मोर्चा:तीन दिवसांत समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांचे आश्वासन