![]()
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या मान्सूनने अखेर २२ जूनपासून अहिल्यानगर जिल्ह्यात हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनाने वातावरणात गारवा निर्माण झाला असून, उकाड्याने हैराण झालेल्या नगरकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात पावसाचे वितरण संमिश्र असले तरी, ज्या भागात पाऊस बरसला, तिथे शेतीच्या मशागतीच्या कामांनी चांगला वेग घेतला आहे. शहरात गेल्या काही दिवसांपासून ऊन-सावल्यांचा खेळ सुरू आहे. सकाळी ढगाळ वातावरण आणि अधूनमधून सूर्यदर्शन अशा स्थितीत दुपारी ४ नंतर पावसाच्या सरी बरसत आहेत. रविवारी सुटीच्या दिवशी सावेडी, केडगाव, बालिकाश्रम रोड आणि भिंगार परिसरात पावसाने हजेरी लावल्याने बाजारपेठेत खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र, या हजेरीमुळे वातावरणात निर्माण झालेला गारवा सुखद ठरला आहे. ग्रामीण भागात नेवासे तालुक्यातील सोनई, वडाळा, घोडेगाव, शिंगवे तुकाई, घोडेगाव एमआयडीसी परिसरात सर्वदूर पाऊस झाला आहे. मात्र, शिर्डीसह पाथर्डी, कर्जत, जामखेड आणि पारनेर तालुक्यातील अनेक भागांना अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. २८ जूनपर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण ५१.२% पाऊस झाला. काही तालुक्यांत स्थिती चिंताजनक आहे. कर्जत (१३०.१%) आणि जामखेड (१०६.८%) तालुक्यांनी सरासरी ओलांडली असून दमदार पाऊस झाला आहे. राहुरी (६.७%), अकोला (११.३%) आणि संगमनेर (१६.२%) तालुक्यांत पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेचे वातावरण आहे. कोपरगाव, श्रीरामपूर आणि राहाता तालुक्यासह परिसराची वाटचालही संथ (सुमारे २७%) सुरू आहे. नगर, श्रीगोंदे, पाथर्डी आणि नेवासे या तालुक्यांमध्ये मात्र ५० ते ६८ टक्क्यांपर्यंत समाधानकारक पाऊस झाला आहे. हवामान खात्याचा यलो अलर्ट हवामान खात्याने जिल्ह्यात २८ जून ते २ जुलैदरम्यान यलो अलर्ट जारी केला आहे. या चार दिवसांत तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, मध्यम पाऊस आणि ३०-५० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Source link
मान्सून . सुटीच्या दिवशी पावसाच्या सरी; उकाड्यापासून नागरिकांची सुटका:जिल्ह्याच्या काही भागांमध्ये दमदार, तर काही ठिकाणी अद्यापही प्रतीक्षा