![]()
.
आमुची मिरासी पंढरी| आमुचे घर भिमातीरी|| पांडुरंग आमुचा पिता| रखुमाई आमुची माता|| अशा सर्व संतांचे माहेर असलेले पंढरपूर वारीकरिता सदगुरु श्री संत वासुदेव महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे जेष्ठ शुद्ध द्वादशीच्या पावन पर्वावर श्री क्षेत्र श्रद्धासागर येथून टाळ, मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान झाले.
संस्थाध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले, गोकर्णाबाई अवचार, शोभा देवतळे यांच्या हस्ते पहाटे श्रींचा अभिषेक झाला. सकाळी प्रस्थानाचे कीर्तन, श्रींच्या रजत मुखवटा व पादुकांचा अभिषेक, महाप्रसाद घेऊन दुपारी एक वाजता श्रींचा पालखी सोहळा निघाला. पालखी मार्गाने ज्ञानोबा तुकाराम, ॐ वासुदेव नमो नमः तथा अनेक संतांच्या अभंग गायन भजनानंदात पालखी सोहळा मार्गस्थ झाला. अकोटवासीयांनी ठिकठिकाणी सडा, रांगोळ्या, पुष्पवृष्टी करून गुरुवर्य श्री संत वासुदेव महाराज यांचे श्रद्धापूर्वक स्वागत केले. हरिनामाच्या गजराने अकोटनगरी दुमदुमली होती. पताकाधारी दिंडीच्या मागे स्वानंद सुख निवासी सदगुरु श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्री क्षेत्र आळंदी देवाची उपशाखा असलेल्या श्री संत वासुदेव महाराज वारकरी शिक्षण संस्था, श्रीक्षेत्र श्रद्धासागर, कोट येथील सर्व विद्यार्थी वारकरी पोशाखामध्ये पावल्या व अभंग गायन करतांना बघून आकोटचे वैभव वृद्धिंगत होत असल्याच्या भावना भाविकांमध्ये व्यक्त झाल्या.
पालखी सोहळा प्रस्थान प्रसंगी संस्थाध्यक्ष वासुदेवराव महाराज महल्ले यांचे कीर्तन झाले. विश्वस्त मंडळाचे महादेवराव ठाकरे, पुरुषोत्तम लाजूरकर, रवींद्र वानखडे, मोहनराव जायले, अविनाश गावंडे, डॉ. अशोकराव बिहाडे, सुनंदा आमले, जयदीप सोनखासकर, गजाननराव चोपडे, अशोकराव पाचडे, नंदकिशोर हिंगणकर, पुरुषोत्तम मोहोकार, शिरीष ढवळे, अनिल कोरपे, केशवप्रसाद राठी, गजाननराव दुधाट, दिंडी व्यवस्थापक अंबादास महाराज मानकर आदी उपस्थित होते.
श्रींच्या पालखी सोहळ्याचे क्षेत्र श्रद्धासागर येथे हरिओम ठाकरे राजूरा, ललितादेवी अग्रवाल (रिधोरा) यांनी वारकऱ्यांना महाप्रसादाची सेवा अर्पण केली. पालखी मार्गावर सुभाष अंबाळकर, हनुमान मुरकुटे, डॉ. सुनील पांडे, सुशील पुंडकर, नंदूभाऊ जांभुळकर, पुरुषोत्तम लाजूरकर, अविनाश सावरकर, सूरज वाघ, संजय गावंडे, बिट्टू पाचडे, डॉ. सुहास कुलट, दिलीप बोचे, श्री संत वासुदेव महाराज निवासस्थान, राम पारवाणी, निशांत पतसंस्था, पुष्पांजली मंगल कार्यालय, पंकज कुलट आदी भक्तांनी ठिकठिकाणी चहा, फराळ, फळ, शीतपेय, आम्ररस इत्यादी अर्पण करून वारकऱ्यांचे स्वागत केले. श्री दत्त मंदिर, कोला रोड येथे गजानन जायले यांच्याकडे महाप्रसाद व रात्रीचा मुक्काम होता.