.

शिक्षण विभागाने बऱ्यापैकी गाजावाजा करीत मंगळवारी ३० जून रोजी निवडक शाळांमध्ये प्रवेशोत्सवाचे समारंभ आयोजित केले आहेत. परंतु व्यापक प्रमाणातील वास्तविक चित्र मात्र काही वेगळेच आहे. ग्रामीण तसेच शहरी भागांतील अनेक शासकीय आणि जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती अत्यंत नादुरुस्त व जर्जर अवस्थेत पोहोचल्या आहेत. अनेक ठिकाणी वर्गांची छते गळत असून, भिंतींना मोठे तडे गेले आहेत. जिल्ह्यात अशा १३७ शाळा असून त्यातील २३० वर्गखोल्या निर्लेखनाच्या उंबरठ्यावर पोहोचल्या आहेत. यामुळे हजारो विद्यार्थ्यांची सुरक्षा आता गंभीर झाली असून, पालक आणि शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
मेळघाट याबाबत सर्वाधिक दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. मेळघाटमध्ये धारणी व चिखलदरा असे दोन तालुके आहेत. या दोन तालुक्यांसह जिल्ह्यातील सर्व १४ तालुके मिळून जिल्ह्यात एकूण १५४९ शाळा आहेत. जिल्हा परिषदेच्या तपासणीदरम्यान यापैकी ४६३ शाळांची दुरुस्ती यावर्षी करावयाची होती. त्यासाठी ११ कोटी ८८ लाख ९० हजार रुपयांचा प्रस्तावही तयार करण्यात आला. परंतु उन्हाळ्याची सुटी संपून शाळेचे नवीन सत्र सुरु होण्याचा दिवस तोंडावर आला तरी जिल्हा परिषदेच्या शिक्षण व बांधकाम विभागाकडे याबाबतची नेमकी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे आजघडीला जिल्ह्यातील किती शाळांची दुरुस्ती पूर्णत्वास गेली आणि किती शाळांची दुरुस्ती अद्याप सुरु आहे, हे कळायला मार्ग नाही. उर्वरित,पान.४ समूह साधन केंद्राची दुर्दशा : मेळघाटमधील एका गावच्या शाळेत समूह साधन केंद्र अर्थात केंद्रप्रमुख ज्याठिकाणचे आहे ती शाळा. नाव अजूनही गायबच : जिल्हा मुख्यालय असलेल्या अमरावतीला अगदी खेटून असलेल्या भातकुलीची ही शाळा. जिल्हा परिषदेने यावर्षी सुमारे १३ कोटी रुपये खर्चाचा नव्या वर्गखोल्यांच्या बांधकामाचा प्रस्ताव तयार केला होता. १०८ शाळांमध्ये १२५ नव्या वर्गखोल्या या रकमेतून बांधल्या जाणार होत्या. परंतु जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प पाहिल्यास मार्च २०२६ अखेर एक छदामही खर्च झालेला नाही. सध्या या कामासाठीची प्रशासकीय मान्यता देण्याचे काम सुरु असल्याचे शिक्षणाधिकारी यांच्याकडून कळले.
तत्काळ निधीची गरज जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील सर्व नादुरुस्त शाळांचे तातडीने स्ट्रक्चरल ऑडिट करून घेणे गरजेचे आहे. ज्या इमारती अतिधोकादायक आहेत, तिथे तत्काळ वर्ग भरवणे बंद करून पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी आणि त्यांच्या जीविताचे रक्षण करण्यासाठी शासनाने विशेष निधी मंजूर करण्याचीही अत्यंत आवश्यकता आहे.
मंत्री डॉ. पंकज भोयर म्हणतात, काम प्रगतीपथावर मोजक्याच शाळांचे झाले बांधकाम या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ पंकज भोयर यांनी रविवारी अमरावतीत शिक्षण विभागाचा आढावा घेतला. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, काही मोजक्याच आदर्श शाळांचे बांधकाम होऊ शकले. सध्या ज्या शाळांचे बांधकाम प्रगतीपथावर आहे, ते तातडीने पूर्ण करण्याला प्राधान्य देण्याचेही त्यांनी मान्य केले. शिवाय तशा सूचना देखील दिल्या आहेत.