![]()
प्रतिनिधी|दिंडोरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यभर जातिव्यवस्थेच्या अनिष्ट प्रथांविरुद्ध लढा दिला. त्यांनी केवळ एका समाजासाठी नव्हे, तर संपूर्ण मानवतेवर आधारित समाज रचनेचा विचार मांडून देशाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन रा. स. वाघ शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी यांनी केले. मोहाडी येथे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संत सावता माळी मंडळाचे अध्यक्ष शंकर तिडके, सह्याद्री फार्मचे मदन शिंदे, सोसायटीचे संचालक रामदास मौले, संजय गोवर्धने, बाकेराव मौले, सुरेश कळमकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सायंकाळी मोहाडी परिसरातून महात्मा फुले यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. महात्मा फुले यांचा विजय असो, अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. या मिरवणुकीत युवक, महिला आणि अबालवृद्धांचा सहभाग लक्षणीय होता. यावेळी बोलताना वक्त्यांनीही महात्मा फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याचा गौरव केला. यावेळी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून क्रांतीसूर्याला अभिवादन केले.
Source link
फुले यांनी जातिव्यवस्थेला विरोध करून मानवतेचा विचार मांडला:मोहाडी येथे महात्मा फुले जयंती कार्यक्रमात शहाजी सोमवंशी यांचे प्रतिपादन