राज्यातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतून 92 लाख लाभार्थ्यांची नावे वगळण्यात आल्याच्या चर्चेदरम्यान शिवसेना नेते तथा मंत्री संजय शिरसाट यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. ही योजना बंद होणार नसून केवळ अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून कमी के
.
‘लाडकी बहीण योजना सुरूच राहणार’
लाडकी बहीण योजनेतून मोठ्या प्रमाणावर नावे कमी केल्याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, ही योजना सुरू करतानाच राज्याच्या तिजोरीवर आर्थिक ताण येणार असल्याची सरकारला पूर्ण कल्पना होती. तरीही सर्वसामान्य महिलांना आर्थिक आधार मिळावा, त्यांचा संसार उभा राहावा आणि त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला.
ते म्हणाले, “काही जण प्राप्तिकर भरतात, काहींकडे चारचाकी वाहने आहेत, काही नोकरीत आहेत, तर काही पुरुषांनीही महिला म्हणून अर्ज करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे जे या योजनेच्या निकषात बसत नाहीत, त्यांचीच नावे वगळली जात आहेत. पात्र महिलांना वगळण्याचा प्रश्नच नाही.”
शिरसाट यांनी पुढे स्पष्ट केले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लाभार्थी महिलांनी कोणतीही चिंता करण्याचे कारण नाही.
‘कॅग’च्या अहवालावरही प्रतिक्रिया
लाडकी बहीण योजनेमुळे राज्याच्या अर्थसंकल्पावर ताण आल्याचा ‘कॅग’च्या अहवालात उल्लेख करण्यात आला आहे. यावर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, या योजनेमुळे आर्थिक ताण वाढल्याचे सरकार लपवत नाही. मात्र, त्यासाठी पर्यायी आर्थिक नियोजन केले जात असून इतर योजनांमध्ये आवश्यक ते बदल करून निधीची व्यवस्था केली जात आहे.
‘विरोधकांचे आरोप बिनबुडाचे’
शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. विरोधकांना आकडेवारीची माहिती नसताना ते आरोप करत असल्याचे सांगत, दर आठवड्याला शेतकऱ्यांच्या खात्यात किती पैसे जमा होत आहेत, याची माहिती तपासावी, असा सल्लाही त्यांनी दिला.
वारकरी अपघात दुर्दैवी; काळजी घेण्याचे आवाहन
वारकऱ्यांच्या दिंडीतील अपघातावर शिरसाट यांनी शोक व्यक्त केला. या दुर्घटनेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याची माहिती त्यांनी दिली. मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत दिली जाईल, तर जखमींवर मोफत उपचार केले जातील, असे त्यांनी सांगितले. वारकऱ्यांना आवाहन करताना ते म्हणाले की, लाखो भाविक वारीत सहभागी होत असतात. त्यामुळे वाहनांच्या फिटनेसकडे आणि सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. अपघात टाळण्यासाठी सर्वांनी आवश्यक खबरदारी घ्यावी.
धाराशिवमधील विषबाधा प्रकरण गंभीर
धाराशिवमध्ये वारकऱ्यांसाठी आणलेल्या थंड पेयामुळे विषबाधा झाल्याच्या घटनेवरही त्यांनी चिंता व्यक्त केली. सुदैवाने हे पेय वारकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही, अन्यथा मोठी दुर्घटना घडली असती, असे ते म्हणाले. संबंधित पेयाचा साठा जप्त करण्यात आला असून त्याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मराठवाड्यात दुष्काळाची भीती
मराठवाड्यात पावसाअभावी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याचे शिरसाट यांनी मान्य केले. अनेक शेतकरी पेरणी करावी की नाही, या संभ्रमात आहेत. काही ठिकाणी बैल नसल्याने शेतकरी स्वतः मशागत करत असल्याचे चित्र आहे. हीच परिस्थिती कायम राहिली तर मराठवाडा आणि विदर्भात मोठा दुष्काळ पडू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
या पार्श्वभूमीवर सरकार परिस्थितीवर दररोज लक्ष ठेवून असून, मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विशेष बैठक घेणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
विनायक राऊत प्रकरणातील आरोप गंभीर
विनायक राऊत यांच्या कुटुंबाविरोधात सुनेने केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना शिरसाट म्हणाले की, पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून सरकारनेही याची गंभीर दखल घेतली आहे. कायद्याप्रमाणे पुढील कारवाई होईल, असे त्यांनी सांगितले.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांवर टीका
उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेवर टीका करताना शिरसाट म्हणाले की, त्यांच्याकडे आता ठोस विषय उरलेले नाहीत. केवळ टोमणे मारणे हा त्यांच्या पत्रकार परिषदेचा उद्देश असल्याचा आरोप त्यांनी केला.
तर संजय राऊत यांच्यावरही त्यांनी टीका करत, रामरक्षा पठणासारख्या विषयांवर अनावश्यक राजकारण करण्याऐवजी सकारात्मक सूचना कराव्यात, असा टोला लगावला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वाधिक काळ मुख्यमंत्रिपद भूषविण्याचा विक्रम केल्याबद्दल शिरसाट यांनी त्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व लाभले असून फडणवीसांनी भविष्यात आणखी मोठे यश मिळवावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
संबंधित बातमी वाचा..
तुमचंही नाव तर कटलं नाही ना?:’लाडकी बहीण’ योजनेतून 92 लाख महिला वगळल्या, ई-केवायसी न केल्याचा बसला सर्वाधिक फटका

राज्य सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठ्या प्रमाणावर लाभार्थ्यांची छाटणी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत 92 लाख महिलांची नावे योजनेतून वगळण्यात आली आहेत. काही दिवसांपूर्वी ही संख्या सुमारे 80 लाख असल्याचे सांगण्यात आले होते, मात्र पडताळणीची प्रक्रिया पुढे सरकल्यानंतर अपात्र लाभार्थ्यांचा आकडा आणखी वाढला आहे. सुरुवातीला सुमारे 2.4 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला होता. मात्र आता जवळपास 38 टक्के लाभार्थी यादीबाहेर गेले आहेत. विशेष म्हणजे, सुमारे 14 हजार पुरुषांनीही या योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केल्याचे पडताळणीत समोर आले असून त्यांनाही अपात्र ठरवण्यात आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी