![]()
शनिवारी भरदुपारी झालेले हॉटेल व्यावसायिक आकाश दुबैया यांच्या निर्घृण हत्येचे पडसाद शहरासह संपूर्ण तालुक्यात उमटत आहेत. या घटनेच्या निषेधार्थ सलग दुसऱ्या दिवशीही श्रीरामपूर शहर आणि परिसरात बेमुदत बंद पाळण्यात आला. व्यापारी, विविध राजकीय पक्षांचे नेते आणि नागरिक या गुन्हेगारीविरोधात कमालीचे आक्रमक झाले असून, मंगळवारी बाजारपेठेसह शहरातील शाळा आणि महाविद्यालयेही बंद ठेवण्यात आली. या हत्येचा तीव्र निषेध नोंदवण्यासाठी आणि गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बुधवारी (१५ जुलै) शहरात निषेध मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली. सोमवारी सकाळी शहरातील ऐतिहासिक महात्मा गांधी चौकात सर्वपक्षीय नेते आणि नागरिकांची मोठी बैठक पार पडली. याप्रसंगी आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्ष करण ससाणे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे, माजी खासदार सदाशिव लोखंडे, वैशाली चव्हाण, प्रकाश चित्ते, बाबा शिंदे, रवी पाटील, प्रवीण गुलाटी, राजेंद्र देवकर, लखन भगत यांच्यासह हजारो नागरिक उपस्थित होते. बैठकीत बोलताना नेत्यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर तीव्र चिंता व्यक्त केली. श्रीरामपूरमधील व्यापारी, डॉक्टर, आणि लहान-मोठ्या दुकानदारांना सातत्याने होणारा त्रास, तसेच महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न यावेळी ऐरणीवर आणला गेला. शहरात फोफावलेले ड्रग्स, गुंगीच्या गोळ्या, जुगार आणि वाळूचे अवैध धंदे यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असल्याचा आरोप करण्यात आला. या गुन्हेगारीच्या मुख्य म्होरक्यासह (आका) सर्व गुंडांवर तातडीने ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करून त्यांना तडीपार करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. हेवेदावे बाजूला सारून एकत्र येण्याचे आवाहन गेल्या दीड-दोन वर्षांत अनेक मुली बेपत्ता होणे, ड्रग्सचे मोठे साठे सापडणे यांसारख्या गंभीर घटना घडूनही ठोस तपास न झाल्याबद्दल नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला. या गुंडगिरीला प्रशासन आणि छुपी राजकीय शक्ती जबाबदार असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. आता सर्व राजकीय पक्षांनी आपापसातील हेवेदावे बाजूला ठेवून या गुंडगिरीचा बिमोड करण्यासाठी एकत्र येण्याची गरज असल्याचे आवाहन करण्यात आले.
Source link
उद्या भव्य मोर्चा:व्यावसायिक दुबैया हत्येप्रकरणी श्रीरामपूर सलग दुसऱ्या दिवशी 'कडकडीत' बंद