![]()
मानवी हक्कांच्या पुनर्स्थापनेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड येथे पुकारलेल्या ऐतिहासिक चवदार तळे सत्याग्रहाचे हे शताब्दी वर्ष आहे. सरंजामशाहीने हिरावून घेतलेली मानवी प्रतिष्ठा पुन्हा मिळवून देण्यासाठी महाडमध्ये झालेल्या दोन परिषदांनी केवळ अस्पृश्यांच्याच नव्हे, तर भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीला नवी दिशा दिली. या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने डॉ. बाबासाहेबांच्या त्या क्रांतिकारी विचारांचे स्मरण करणे आणि हा इतिहास अभ्यासक्रमाचा भाग होणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. डॉ. बाबासाहेबांच्या मते, रोटी बंदी आणि बेटी बंदी या केवळ सहवासाच्या मर्यादा नसून त्या ‘असमान दर्जा’ सिद्ध करणाऱ्या खुणा आहेत. अस्पृश्यांना पाणी पिण्यास मज्जाव करणे म्हणजेच त्यांना समान दर्जा नाकारणे होय. युरोपात विवेकवाद आणि विज्ञानाचा स्वीकार करून प्रबोधन झाले, तसे सर्वांगीण प्रबोधन भारतात न झाल्यानेच येथे सरंजामशाहीचे अवशेष शिल्लक राहिल्याची खंत व्यक्त केली होती. महाडच्या क्रांतीचा इतिहास अद्याप आपल्या शैक्षणिक अभ्यासक्रमात म्हणावा तसा समाविष्ट झालेला नाही. या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने हा प्रेरणादायी लढा पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावा. डॉ. बाबासाहेबांनी आपल्या भाषणात अस्पृश्यांच्या लष्करी कारकिर्दीवर प्रकाश टाकला होता. इंग्रजांनी अस्पृश्यांना लष्करी पेशा उपलब्ध करून दिल्याने त्यांना नोकरीसह समाजात एक दर्जा प्राप्त झाला होता. ‘अनार्य दोष परिहार मंडळी’ यांसारख्या संस्थांनी गोपाळ बाबा वलंगकर यांच्या नेतृत्वाखाली अस्पृश्यांच्या उद्धाराचे कार्य सुरू केले होते.
Source link
महाडच्या सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष; अभ्यासक्रमात समावेश करा:मार्च 1927 मध्ये महाडच्या चवदार तळ्यावर केलेला सत्याग्रह मानवमुक्तीसाठीचा लढा हाेता