![]()
वारकरी संप्रदायाने समाजाला एकत्र ठेवण्याचे आणि समतेचा संदेश देण्याचे महान कार्य केले आहे. ज्ञानी-अज्ञानी, श्रीमंत-गरीब असा कोणताही भेद न करता सर्वांना स्वीकारणारा देव म्हणजे पांडुरंग होय. भक्तांची वाट पाहणारा देव म्हणजे विठ्ठल; जो जो मनुष्य आपल्या क्
.
श्रीक्षेत्र सरला बेट येथील श्री संत गंगागिरी महाराज वारकरी पायी पालखी दिंडी सोहळ्याचे अहिल्यानगर शहरात अभूतपूर्व उत्साहात आगमन झाले. शहरात दाखल होताच सावेडी परिसरात भव्य रिंगण सोहळा आणि अश्वमेधाच्या मनोहारी सादरीकरणाने उपस्थित हजारो भाविकांचे डोळे दिपवून टाकले. याप्रसंगी स्वर्गीय बाबासाहेब बारस्कर कुटुंबीयांच्या वतीने पालखीवर भव्य पुष्पवृष्टी करत दिंडीचे मोठ्या भक्तिभावाने शाही स्वागत करण्यात आले. या सोहळ्यात वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ प्रवचनकार महंत रामगिरी महाराज यांचे स्वागत बारस्कर कुटुंबीयांच्या वतीने आमदार संग्राम जगताप, महापौर ज्योती गाडे, बाळासाहेब बारस्कर, मनपा महिला व व बालकल्याण समितीच्या सभापती दीपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप, सचिन बारस्कर, माजी नगरसेवक सतीश बारस्कर, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे, आकाश कातोरे, नगरसेविका शारदा ढवण, योगेश ठुबे, संजय ढोणे, दत्ता तापकिरे आदी मान्यवरांनी केले. रामगिरी महाराज बोलत होते. ते म्हणाले, माता-पित्याची सेवा हीदेखील पांडुरंगाचीच सेवा आहे. जीवनात परिवर्तन कायम असते, मात्र चढ-उतारात मन स्थिर ठेवण्यासाठी भगवंताच्या नामाचा जप आवश्यक आहे. आमदार जगताप म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या भगव्या पताकेला गौरवाचे स्थान मिळवून दिले, तो वारकऱ्यांचा भगवा ध्वज पाहिल्यानंतर नवचैतन्य निर्माण होते आणि अधिक काम करण्याची प्रेरणा मिळते. संतांची ही विचारधारा पुढे नेण्यासाठी युवकांनी वारीत सहभागी होणे गरजेचे आहे.
मंदिरात चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे प्रवचनादरम्यान रामगिरी महाराज यांनी अलीकडेच अपघातात प्राण गमावलेल्या वारकऱ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली. वारकऱ्यांनी वारीत शिस्त पाळावी, आरोग्याची काळजी घ्यावी आणि वाहतुकीचे नियम पाळावेत, असे आवाहन त्यांनी केले. अन्नपदार्थांतील भेसळ रोखण्यासाठी आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेल्या धडक मोहिमेचे कौतुक केले. राज्यात अशा धाडसी अधिकाऱ्यांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच राम मंदिर चोरी प्रकरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत, मंदिरात चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे, असे सांगत या विषयावर राजकारण न करण्याचे स्पष्ट केले. आमदार संग्राम जगताप यांच्या हिंदुत्ववादी कार्याचेही त्यांनी यावेळी कौतुक केले.