राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतलेली भेट, आणि त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम
.
नवी दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर उपोषणाला बसलेले पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी विलीनीकरणाच्या विषयावर अत्यंत संवेदनशीलपणे भाष्य केले:
अजितदादांची ती शेवटची इच्छा होती, पण…
सुप्रिया सुळे म्हणाल्या, “माझा भाऊ आज राहिलेला नाही. त्यामुळे माझ्या भावाबद्दल आणि तेव्हा झालेल्या चर्चेबद्दल आता आम्ही पूर्णविराम दिला आहे. माझ्या भावाला जाऊन आता पाच महिने झाले आहेत. आम्ही एक कुटुंब म्हणून या दुःखातून कुठेतरी सावरण्याचा प्रयत्न करत आहोत. दोन्ही पक्ष एकत्र यावेत आणि सर्वांनी मिळून गुण्यागोविंदाने राज्य व देशाची सेवा करावी, ही माझ्या भावाची शेवटची इच्छा होती. ती पूर्ण करण्याची आमची इच्छा दादा असतानाही होती आणि दादा गेल्यावरही होती. पण, आता समोरच्या बाजूने तशी कोणतीही भावना किंवा प्रतिसाद दिसत नाही.”
त्यांच्या नकारामुळे आम्हाला प्रचंड दुःख झाले
अजित पवारांच्या मृत्यूनंतर समोरच्या गटाने घेतलेल्या भूमिकेबद्दल सुप्रिया सुळे यांनी तीव्र नाराजी आणि दुःख व्यक्त केले. त्या म्हणल्या, “ज्या दिवशी अजितदादांचे निधन झाले, त्या दिवशी आमच्या काही नेत्यांनी दादांची ही शेवटची इच्छा जाहीरपणे बोलून दाखवली होती. मात्र, समोरच्या बाजूच्या नेत्यांनी ‘अशी कोणतीही चर्चा झालीच नव्हती’ असे म्हणत तो दावा फेटाळून लावला. ते ऐकून आम्हाला कुटुंबाला आणि सहकाऱ्यांना प्रचंड दुःख आणि वेदना झाल्या होत्या.”

आम्ही स्वाभिमानी लोक आहोत, विषय तिथेच संपवला
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “तो प्रस्ताव प्रत्यक्ष माझ्या भावाचा होता. त्यामुळे त्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न होते. पण जेव्हा मला जाणवले की, समोरचे नेते दादांची इच्छा पूर्ण करण्यास अनुकूल किंवा रास्त नाहीत, तेव्हा आम्ही तो विषय त्याच दिवशी संपवून टाकला. आम्ही अत्यंत स्वाभिमानी लोक आहोत. त्यामुळे आता आम्ही तो विषय मागे सारून पुन्हा एकदा पूर्ण ताकदीने राज्य आणि देशाच्या सेवेसाठी कामाला लागलो आहोत.”

अखेर सुनील तटकरेंनी दिली कबुली
विशेष म्हणजे, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत किंवा एकत्रीकरणाबाबत यापूर्वी कोणतीही अंतर्गत बैठक किंवा चर्चा झाली नसल्याचा दावा करणारे खासदार सुनील तटकरे यांनी आज अखेर एक पाऊल मागे घेतले. पत्रकार परिषदेत बोलताना तटकरे यांनी मान्य केले की, अजित पवार हयात असताना दोन्ही पक्ष एकत्र येण्याबाबत प्राथमिक पातळीवर नक्कीच चर्चा झाली होती. तटकरेंच्या या कबुलीनंतर सुप्रिया सुळे यांनी घेतलेल्या आक्रमक आणि तितक्याच भावनिक पवित्र्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात हा विषय पुन्हा एकदा केंद्रस्थानी आला आहे.
हे ही वाचा…
सरकार इतकं असंवेदनशील का?:सोनम वांगचुक यांच्या भेटीनंतर सुप्रिया सुळेंचा सवाल, संसदेत सरकारला घेरण्याचा इशारा

दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला रविवारी २० दिवस पूर्ण होत आहेत. त्यांच्या ढासळत्या प्रकृतीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी जाऊन वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी सुप्रिया सुळे यांनी अत्यंत आक्रमक पवित्रा घेत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आगामी २० तारखेला संसदेचे कामकाज सुरू होताच, आम्ही केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरणार असल्याचे सुळे यांनी यावेळी स्पष्ट केले. त्यांच्या या घोषणेमुळे आगामी अधिवेशनात विरोधक आक्रमक राहतील, हे स्पष्ट झाले आहे. सविस्तर वाचा…