![]()
समाजात घडणाऱ्या विविध घटनांचे पडसाद विद्यार्थी मनावर होत असतात व त्यातूनच त्यांची मने घडत असतात. त्यामुळे समाजात घडणारे नैतिक, अनैतिक प्रकार, भेसळ, फसवणूक या सगळ्यातून वाचण्यासाठी विद्यार्थ्यांची ’ग्राहक दृष्टी’ विकसित होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन ग्राहक पंचायत महाराष्ट्रचे जिल्हाध्यक्ष गजेंद्र क्षीरसागर यांनी केले. विद्यार्थी ग्राहक प्रबोधन अभियानांतर्गत रूपीबाई मोतीलालजी बोरा न्यू इंग्लिश स्कूल तसेच विश्रामबाग प्रॅक्टिसेस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. क्षीरसागर म्हणाले, विद्यार्थी दशेमध्ये असतानाच समाजात होणारी फसवणूक, अन्न भेसळ, नैतिक अनैतिक गोष्टी यांची जाणीव व्हायला हवी. रिल्सच्या आहारी न जाता मोबाइलचा सकारात्मक वापर करणे, चांगल्या-वाईट गोष्टींमधील फरक लक्षात घेणे, फसवणुकीचे अनेक मार्ग आणि सायबर गुन्हे याची माहिती होणे आवश्यक आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण होऊन विद्यार्थ्यांची याकडे बघण्याची दृष्टी विकसित होणे गरजेचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची ग्राहक दृष्टी विकसित करणे हेच खरं या चळवळीचे कार्य आहे. जिल्हा सचिव सिद्धार्थ वाघमारे यांनी विद्यार्थ्यांना ग्राहक संरक्षण कायदा आणि ग्राहक चळवळ समजून सांगितली तर महिला संघटिका शलाका रसाळ यांनी छोट्या-छोट्या उदाहरणातून विद्यार्थी ग्राहकांची होणारी फसवणूक कशा प्रकारे होऊ शकते हे समजावून सांगितले. संजय जोशी यांनीही विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्या गांगर्डे, ढोकळे सर, भांड आर. एन., सोमनाथ नजन आदी उपस्थित होते.
Source link
रिल्सच्या आहारी न जाता मोबाइलचा सकारात्मक वापर करा- क्षीरसागर:जिल्हा ग्राहक पंचायततर्फेशालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन