![]()
पुण्यात वंचित बहुजन आघाडीने नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ मोर्चा काढला. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणाची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शनिवारवाडा येथून सुरू झालेला हा मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत नेण्यात आला. या मोर्चामध्ये वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला. पेपरफुटीच्या घटनांमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, त्यांच्या शैक्षणिक भवितव्याशी खेळ केला जात असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. अशा प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर गंभीर आणि विपरीत परिणाम होतो, असे मत व्यक्त करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीचे पुणे शहराध्यक्ष ॲड. अरविंद तायडे यांनी सांगितले की, नीट परीक्षेसाठी देशभरातील लाखो विद्यार्थी अनेक महिने कठोर परिश्रम घेऊन अभ्यास करतात. मात्र, पेपरफुटीसारख्या घटनांमुळे त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरते. तायडे यांनी दावा केला की, पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर देशभरात आतापर्यंत २३ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. विद्यार्थ्यांनी नैराश्यातून उचललेल्या या टोकाच्या पावलांना जबाबदार कोण, याचे उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावे, अशी मागणीही त्यांनी केली. आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, धर्मेंद्र प्रधान यांचा तात्काळ राजीनामा घेण्याऐवजी केंद्र सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. दिल्लीतील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर करण्यात आलेला लाठीमार अमानवी असल्याचे सांगत त्याचाही निषेध करण्यात आला. सरकारने विद्यार्थ्यांच्या भावना आणि त्यांच्या भविष्याचा गांभीर्याने विचार करून पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मोर्चाद्वारे करण्यात आली.
Source link
नीट पेपरफुटीविरोधात पुण्यात वंचित बहुजन आघाडीचा मोर्चा:धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी, विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर चिंता व्यक्त.