![]()
नीट पेपरफुटी प्रकरणाच्या विरोधात देशभरातील विद्यार्थ्यांनी राजधानी दिल्लीत आक्रमक आंदोलन सुरू केले आहे. या प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून तसेच विरोधी पक्षांकडून केली जात आहे. 20 जुलै रोजी कॉकरोच जनता पार्टीने ‘चलो संसद’ मोर्चा सुरू केला, मात्र त्यांच्यावर पोलिसांनी लाठीचार्ज केला. याच्या निषेधार्थ आता अनेक स्तरातून प्रतिक्रिया येत आहेत. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. जितेंद्र आव्हाड म्हणाले, शेवटी भीती भीती भीती आणि भीती, वाघ म्हणला तरी खणारच आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातून भीतीच नाहीशी झाली आहे. तुम्ही त्यांना कितीही कोंडण्याचा प्रयत्न केला की ते दुसऱ्या मार्गाने घुसणार. ते वयच तसे असते. त्या वयात ते बेदरकार असतात. खवळलेले रक्त असते. त्याला तुम्ही दादागिरीने नाही शांत बसू शकणार, त्याला आईची मायाच लागते. आणि सरकारला म्हणूनच माय-बाप सरकार म्हणतात, उगीच म्हणत नाही. मुलींना उलटं करून मारले! काय विकृती आहे? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रात्री उशिरा एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले की एक नवीन बिल आणले जाणार आहे आणि या प्रकरणाची फास्ट ट्रॅकवर चौकशी केली जाईल. यावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, तुम्ही कितीही बिलं आणा, काहीही करा. अरे मायेचा हात फिरवा न.. तुम्ही काय करताय? मुलींना उलटं करून मारताय. पुरुषांनी मुलींना हात कशाला लावायला पाहिजे? त्या दादरच्या पोलिसचा व्हिडिओ पाहिला? काय करतोय तो? नागपूरमध्ये एका पोलिसाने एका मुलीला उलटे करून पाडले. पार्श्वभागावर दांडके मारले, काय विकृती आहे ही? असे संतप्त सवाल आव्हाड यांनी केले. विद्यार्थी मारो मारो म्हणतात तेव्हा काय करू शकता तुम्ही? पुढे बोलताना जितेंद्र आव्हाड म्हणाले, मला बाकीच्या गोष्टीत जायचे नाही, पण मी स्वतः विद्यार्थ्यांचे नेतृत्व करतच पुढे आलो आहे. त्यामुळे मला या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात एक वेगळेच प्रेम आहे. मी पक्ष विरहित पाहतोय याकडे. या विद्यार्थ्यांनी अक्षरशः वेड लावले आहे. एक विद्यार्थी पोलिसांच्या समोर उभा राहून ‘मारो मारो’ म्हणतो. मार खाऊन त्यांच्यात संचार येतो, काय करू शकता तुम्ही? त्यावेळी पोलिस फक्त उभे राहिले, अशी प्रतिक्रिया आव्हाड यांनी दिली आहे.
Source link
विद्यार्थ्यांना दादागिरीने नाही, आईच्या माया लागते:मुलींना उलटं करून मारले! काय विकृती आहे? जितेंद्र आव्हाडांचा संताप