![]()
दिल्लीत नीट परीक्षेतील गैरव्यवस्थेविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मोर्शी येथे बहुजन समाज पार्टीने (बसपा) तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली. नीट परीक्षेतील महाघोटाळा आणि भ्रष्टाचाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. नीट परीक्षेचे पेपर वारंवार फुटत असल्याने देशभरात २२ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा आंदोलकांनी केला. या गंभीर विषयाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. जंतर-मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर पोलिसांनी लाठीमार केला, अश्रुधुराचे नळकांडे फोडले, ज्यात अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. देशभरातील गरीब, वंचित, शोषित आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थी कर्ज काढून रात्रंदिवस अभ्यास करून डॉक्टर, इंजिनियर होण्याचे स्वप्न पाहतात. मात्र, सरकारच्या कथित निष्काळजीपणामुळे बावीस लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आले आहे, असे आंदोलकांनी म्हटले. या घटनेचा निषेध करत आंदोलकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तात्काळ राजीनाम्याची मागणी केली. लाठीहल्ला आणि इतर घडामोडींची न्यायालयीन चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली. आंदोलनाच्या शेवटी उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी बहुजन समाज पार्टीचे मोर्शी वरुड विधानसभा अध्यक्ष संजय डवरे, साहेबराव पखाले, ओमप्रकाश निस्वादे, अनिल चौधरी, भाऊराव मेश्राम, संजय कासाडे, जयकिशोर दहिवडे, गजानन वानखडे, संजय कांबळे, प्रवीण कोराटे, सु.शा.बेंडे, गौतम पांडे, संजय नेवारे, नंदकिशोर सारंग, अशोक गायकवाड, सुधाकर उईके, किशोर प्रधान, गजानन धनाडे, लखन तंतरपाळे यांसह शेकडो कार्यकर्ते आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
Source link
नीट पेपरफुटी: दिल्लीतील विद्यार्थ्यांवर लाठीहल्ल्याचा निषेध:मोर्शीत बसपाचे तहसील कार्यालयासमोर निदर्शने, कारवाईची मागणी