![]()
शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी इयत्ता 11 वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अद्याप प्रवेश निश्चित न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष फेरीचे आयोजन करण्यात आले असून, विद्यार्थ्यांनी या अंतिम फेरीत प्रवेश निश्चित करून घेण्याचे आवाहन माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने केले आहे. संचालनालयाने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 15,52,678 लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून 13,43,418 विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. मात्र, काही विद्यार्थ्यांनी अद्याप प्रवेश निश्चित न केल्यामुळे ही विशेष फेरी आयोजित करण्यात आली आहे. या फेरीसाठी 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता रिक्त जागांची माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतर 23 ऑगस्ट दुपारी 1 वाजल्यापासून 24 ऑगस्ट सायंकाळी 6 वाजेपर्यंत नवीन विद्यार्थ्यांना नोंदणी, भाग-1 मधील दुरुस्ती तसेच भाग-2 भरून अर्ज लॉक करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांनी किमान 10 कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविणे अनिवार्य राहणार आहे. प्रवेश वाटप प्रक्रिया 25 ऑगस्ट 2026 रोजी राबविण्यात येणार असून त्याच दिवशी दुपारी 3 वाजता प्रवेश वाटपाची यादी, कट-ऑफ यादी तसेच विद्यार्थ्यांना एसएमएसद्वारे माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी 25 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2026 या कालावधीत आवश्यक कागदपत्र पडताळणी व शुल्क भरून प्रवेश निश्चित करावेत. यानंतर 28 ऑगस्ट रोजी संबंधित प्रशासकीय कामकाज, 29 ऑगस्ट रोजी डेटा प्रोसेसिंग आणि 30 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 11 वाजता रिक्त जागांची पुढील माहिती प्रसिद्ध करण्यात येणार आहे. विद्यार्थी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार आवश्यक कार्यवाही वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) डॉ. महेश पालकर यांनी केले आहे.
Source link
अकरावी प्रवेशासाठी विशेष फेरी जाहीर:23 ऑगस्टपासून नोंदणी सुरू, अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी अंतिम संधी