Headlines

नवी मुंबईत साकारणार 1 लाख विद्यार्थ्यांसाठी भव्य 'एज्युसिटी':5 ऑक्टोबरनंतर दुष्काळाचे पंचनामे; शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही- देवेंद्र फडणवीस




राज्यातील दुष्काळी परिस्थिती, नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत परदेशी विद्यापीठांचे आगमन आणि विरोधकांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सविस्तर भाष्य केले. राज्यात ५ ऑक्टोबरनंतर दुष्काळाचे पंचनामे सुरू करून शेतकऱ्यांना ‘एनडीआरएफ’ची (NDRF) मदत मिळवून दिली जाईल, अशी मोठी घोषणा त्यांनी केली. तसेच, नवी मुंबईत भव्य ‘एज्युसिटी’ उभारली जात असून, राहुल गांधी हे अराजकतावादी मानसिकतेतून लोकशाही संस्थांवर आरोप करत असल्याचा घणाघातही त्यांनी केला. महाराष्ट्रात ७ परदेशी विद्यापीठांचे आगमन राज्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील मोठ्या घडामोडीची माहिती देताना फडणवीस म्हणाले की, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत (NEP) परदेशी विद्यापीठांना भारतात कॅम्पस सुरू करण्याची परवानगी मिळाली आहे. याचाच एक भाग म्हणून ‘वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटी’सह तब्बल ७ परदेशी विद्यापीठे महाराष्ट्रात येत असून, त्यांच्या कॅम्पसचे नुकतेच उद्घाटन करण्यात आले आहे. नवी मुंबईत एक भव्य ‘एज्युसिटी’ (Educity) तयार होत असून, तेथे सुमारे ८० हजार ते १ लाख विद्यार्थी जागतिक दर्जाचे शिक्षण घेऊ शकतील. याशिवाय, मुख्यमंत्री शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ३ भारतीय विद्यार्थ्यांना १००% शिष्यवृत्ती देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. ५ ऑक्टोबरनंतर दुष्काळाचे पंचनामे राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यातील दुष्काळाबाबत राज्य सरकारला पत्र पाठवले होते. या पत्रावर प्रतिक्रिया देताना फडणवीस म्हणाले की, “राज्य सरकारने यापूर्वीच दुष्काळ निवारणासाठी आवश्यक ती पावले उचलली आहेत. राज्यात कर्जमाफीची अंमलबजावणी सुरू असून, पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱ्याची व्यवस्थाही युद्धपातळीवर केली जात आहे. पावसाळ्याचा हंगाम संपल्यानंतर म्हणजेच ५ ऑक्टोबरनंतर नुकसानीचे पंचनामे केले जातील आणि त्यानंतर एनडीआरएफची (NDRF) मदत मिळवण्याची प्रक्रिया सुरू केली जाईल. सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही.” राहुल गांधींवर सडकून टीका भाजप आणि निवडणूक आयोगावर संगनमत करून पक्ष चोरल्याचा गंभीर आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपांचा समाचार घेत देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींवर कडाडून टीका केली. “स्वतःचा आणि पक्षाचा पराभव लपवण्यासाठीच राहुल गांधी असे बिनबुडाचे आरोप करत आहेत. भारतीय संविधान आणि देशाच्या लोकशाही संस्थांवरून सामान्य जनतेचा विश्वास उडवणे, हाच त्यांच्या अराजकतावादी मानसिकतेचा मुख्य उद्देश आहे,” असा पलटवार फडणवीस यांनी केला. —————— ही बातमी पण वाचा.. निकषांची वाट न पाहता राज्यात तत्काळ दुष्काळ जाहीर करा!: शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार द्या; शरद पवारांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र राज्यात पावसाने प्रदीर्घ काळ ओढ दिल्याने निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सविस्तर पत्र लिहून तातडीच्या उपाययोजनांची आग्रही मागणी केली आहे. “शासनाने औपचारिक निकषांची वाट न पाहता गंभीर परिस्थिती असलेल्या तालुक्यांमध्ये त्वरित दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी किमान 50 हजार रुपयांची थेट आर्थिक मदत द्यावी आणि शेतमजुरांच्या खात्यात 25 हजार रुपये जमा करावेत,” अशा प्रमुख मागण्या पवारांनी या पत्राद्वारे केल्या आहेत. राज्यातील विविध शेतकरी संघटनांकडूनही दुष्काळ जाहीर करण्याच्या मागण्या जोर धरत असताना शरद पवारांच्या या पत्रामुळे सरकारवरील दबाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. सविस्तर वाचा



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *