![]()
बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपूरमधील एका कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी कडक शब्दांत समाचार घेतला असून, छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत, “स्वतःच्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती” असे संबोधले आहे. तसेच “अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या राजकारण्यांना सरळ केले पाहिजे,” अशा कडक शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी नागपुरातील कार्यक्रमात बोलताना त्यांनी रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरू होते. तसेच शिवरायांनी मुकुट उतरवून रामदास स्वामींकडे राज्य सोपवण्याची इच्छा केली होती, असा दावा केला. त्यांच्या या दाव्यावर महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज संभाजी छत्रपती यांनी देखील सोशल मीडियावर पोस्ट करून धीरेंद्र शास्त्री यांच्यावर टीका केली आहे. नेमके काय म्हणाले संभाजी छत्रपती? धीरेंद्र शास्त्री ज्या राज्यातील आहे, त्या राज्यातील महान सेनानी छत्रसाल बुंदेला यांना छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी लढून स्वतंत्र राज्य स्थापन करण्याची प्रेरणा दिली होती. हा स्वतःच्या राज्याचा इतिहास माहिती नसणारा व्यक्ती महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा कपोलकल्पित आणि दिशाभूल करणारा इतिहास सांगतो, लढाया करून महाराज थकले म्हणतो आणि लोक त्याच्या समोर बसून टाळ्या वाजवजात, राज्यात त्याचे मोठमोठे कार्यक्रम घेतात, हे अत्यंत दुर्दैवी आहे, असे संभाजी छत्रपती यांनी म्हटले आहे. अशा भोंदू बाबांना मोठे करणाऱ्या लोकांना आणि राजकारण्यांना सरळ केले पाहिजे. राज्य शासनाने या भोंदू बाबाला राज्यात कार्यक्रम घेण्यास बंदी घालावी, अशी मागणी देखील संभाजी छत्रपती यांनी केली आहे. बुवा बाबांनी अध्यात्म सांगावे, इतिहास नको दरम्यान, धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानाने वाद निर्माण झाल्यानंतर, बुवा बाबांनी अध्यात्म सांगावे. मनाला वाटेल तसा इतिहास सांगत बसू नये. हिंदू धर्माच्या अध्यात्माची आणि इतिहासाची उंची अत्युच्च आहे. त्याची वाटेल तशी आणि चुकीच्या पद्धतीची सरमिसळ करून अध्यात्माची आणि इतिहासाची अवहेलना करू नये, असा सल्लाही संभाजी छत्रपती यांनी धीरेंद्र शास्त्री यांना दिला होता. आत्ता पाहू काय म्हणाले होते धीरेंद्र शास्त्री? धीरेंद्र शास्त्री आपल्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज व रामदास स्वामी यांच्या कथित भेटीवर भाष्य करताना म्हणाले होते, सततच्या युद्धामुळे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा खूप थकले, तेव्हा ते एकेदिवशी रामदास स्वामी यांच्याकडे गेले. तिथे त्यांनी आपला मुकूट काढला आणि म्हणाले, आम्ही खूप युद्ध लढले. आता आम्हाला आणखी लढायचे नाही. आता आमच्यावर एक मोठी दया करा, हा माझा मुकूट तुम्ही सांभाळा. हा राजपाठही तुम्हीच सांभाळा. तुमच्या आज्ञेनेच आम्ही इथपर्यंत वाटचाल केली. आता आम्हाला चालणे अवघड झाले आहे. आता आम्हाला युद्ध लढणेही होत नाही. आता आम्ही खूप थकलो. आता आम्हाला विश्रांतही हवी आहे. आता आम्हाला आराम करायचा आहे. आता आम्हाला काही दिवस काहीच करायचे नाही, असे शिवाजी महाराज रामदास स्वामींना म्हणाले. त्यावर रामदास स्वामींनी त्यांची समजूत काढली आणि त्यांना उपदेश केला, असे बागेश्वर बाबा म्हणाले.
Source link
धीरेंद्र शास्त्री स्वत:च्या राज्याचा इतिहास माहीत नसणारा व्यक्ती:छत्रसाल बुंदेला यांचा दाखला देत संभाजी छत्रपती यांची टीका