![]()
ज्येष्ठ नागरिक हे ज्ञानाचे भांडार असून त्यांच्या अनुभवाची गरज कुटुंबासोबतच समाजालाही आहे. त्यामुळे ज्येष्ठांनी हे कार्य अव्याहतपणे सुरु ठेवावे, असे आवाहन संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाचे उपाध्यक्ष डी. एस. पवार यांनी केले.
.
संत गाडगेबाबा ज्येष्ठ नागरिक मंडळाच्यावतीने माहे एप्रिलमध्ये वाढदिवस झालेल्या सभासदांचा सामूहिक वाढदिवस कार्यक्रम येथील विरंगुळा केंद्रात मोठ्या दीमाखात पार पडला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मंडळाचे अध्यक्ष तथा पश्चिम विदर्भ प्रादेशिक विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघाचे राष्ट्रीय सहसचिव पुरुषोत्तम गावंडे होते. मंचावर मंडळाचे उपाध्यक्ष दामोदर पवार, सचिव डॉ. चंदनसिंह राजपूत, मार्गदर्शक प्राचार्य डॉ. दिलीपसिंह खांबरे, डॉ. सतिश तराळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पवार यांनी आपल्या मार्गदर्शनात शासनाच्या ज्येष्ठांसाठीच्या विविध योजनांचीही माहिती दिली. अध्यक्षीय भाषणात पुरुषोत्तम गावंडे यांनी मंडळाच्या कार्याची व शासनाच्या योजनांची विस्तृत माहिती दिली. एस.टी. प्रवासासाठी एनसीएमसी कार्ड आवश्यक असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. प्रारंभी गेल्या महिन्यात वाढदिवस असलेले मंडळाचे उपाध्यक्ष तथा कामगार नेते दामोदर पवार, माजी सचिव देविदास कोल्हे, रामकृष्ण भुस्कडे, बबनराव बोबडे, श्रीकांत देशमुख, घनश्याम मेश्राम, बाबुराव कोंडे, अरविंद देशमुख यांचा यथोचित सत्कार करून मंडळाकडून शुभेच्छा देण्यात आल्या. प्रास्ताविकात प्रा. डॉ. दिलीपसिंह खांबरे यांनी मंडळाच्या स्थापनेपासूनच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. मंडळाला उत्कृष्ट कार्याबद्दल पुरस्कार मिळाले आहेत, तसेच संस्थापक वासुदेवराव उमाळे यांनाही सन्मान मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. बाबुराव कोंडे यांनी मनोगत व्यक्त करताना वयोमानानुसार ज्येष्ठांना अनेक आजार असतात, त्यामुळे त्यांनी नियमित व्यायाम व आयुर्वेदिक औषधोपचाराकडे लक्ष पुरवावे, अशी सूचना केली. कार्यक्रमाची सुरुवात वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण करून झाली. अनिलराव वानखडे यांनी सानेगुरुजींची ‘खरा तो एकची धर्म’ ही प्रार्थना सादर केली. त्यानंतर मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन सचिव डॉ. चंदनसिंह राजपूत यांनी केले, तर आभार राजाभाऊ देशमुख यांनी मानले.