![]()
सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वच आमदार पक्षाध्यक्षा तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या मागे ठामपणे उभे असल्याचा दावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे. काही लोक पक्षाविषयी मुद्दाम षडयंत्र रचत आहेत. पण आम्ही सर्वजण सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे ठामपणे उभे आहोत, असे ते म्हणालेत. दरम्यान, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीतून भाजप जाणाऱ्या 40 लोकांची नावे असल्याचे सांगत एकच खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी गत आठवड्या सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांच्यासह राष्ट्रवादीचे 22 हून अधिक आमदार भाजपकडून निवडणूक लढवणार असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या दाव्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात एकच खळबळ माजली होती. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांनी उपरोक्त दावा केला आहे. तसेच रोहित पवार यांना आपल्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नेमा अशी मागणीही केली आहे. सर्व आमदार सुनेत्रा पवारांच्या पाठीशी सुनील शेळके सोमवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, आम्ही सर्वच आमदार सुनेत्रा वहिनींच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. काही लोक जाणिवपूर्वक षडयंत्र रचत आहेत. मला त्यांना सांगायचे आहे की, सुनेत्रा वहिनींनी पक्षाची धुरा हाती घेऊन केवळ 3 महिन्यांचा कालावधी झाला आहे. आज उपमुख्यमंत्री म्हणून त्या सक्षमपणे पदभार सांभाळत आहेत. अशा कर्तृत्वान महिलेच्या पाठीमागे आपण सर्वांनी उभे राहण्याची राहायचे की त्यांना टार्गेट करायचे हे सर्वांनी ठरवावे. या प्रकरणी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांची व प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक होईल. त्या बैठकीत मी आमदार रोहित पवार यांना आमच्या पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्तेपदी नियुक्ती करण्याची मागणी मी करणार आहे, असे ते यावेळी उपरोधिकपणे म्हणाले. रोहित पवारांकडे भाजपत जाणाऱ्या 40 जणांची नावे – अतुल लोंढे दुसरीकडे, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये जाणाऱ्या 40 जणांची नावे आमदार रोहित पवार यांच्याकडे असल्याचा दावा केला आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेमके कोण चालवत आहे? शरद पवार, भाजप, सुनील तटकरे की प्रफुल्ल पटेल? रोहित पवार यांच्याकडे राष्ट्रवादीच्या 40 लोकांची नावे आहेत, जे भाजपमध्ये जाणार आहेत. मी रोहित पवार यांच्या विधानाशी सहमत आहे. जे पी नड्डा यांनी यापूर्वीच देशात विरोधी पक्षच अस्तित्वात राहणार नसल्याचा दावा केला होता. राष्ट्रवादीतील घटनाक्रम हा तो पक्ष फुटण्याची नांदी आहे, असे ते म्हणालेत. उद्धव ठाकरेंची सभागृहातील उपस्थिती मोदींहून जास्त अतुल लोंढे यांनी यावेळी उद्धव ठाकरे यांच्या सभागृहातील उपस्थितीवरून होणारी टीकाही फेटाळली. या प्रकरणी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील उपस्थिती किती आहे? त्यांची उपस्थितीही अतिशय कमी आहे. ते केवळ टिंगलटवाळी करण्यासाठी संसदेत येतात. उद्धव ठाकरे यांची सभागृहातील उपस्थिती त्यांच्यापेक्षा जास्त आहे.
Source link