Headlines

अभियंत्यांनी रोजगारनिर्माते बनावे:राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांचे आवाहन, म्हणाले- सीओईपी दीक्षांत समारंभात उद्योगांची स्थापना करावी




महाराष्ट्राचे राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती जिष्णु देव वर्मा यांनी सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात अभियंत्यांना केवळ रोजगार शोधण्याऐवजी इतरांसाठी संधी आणि नोकऱ्या निर्माण करणारे उद्योग आणि संस्था स्थापन करण्याचे आवाहन केले. भारताच्या आर्थिक वाढीमध्ये आणि राष्ट्रीय विकासामध्ये सीओईपी महत्त्वाची भूमिका बजावू शकते, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, विद्यापीठाचे नियामक मंडळाचे अध्यक्ष विनायक पै, कुलगुरू प्रा. सुनील भिरुड, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ. यशोधरा हरिभक्त उपस्थित होते. राज्यपाल वर्मा म्हणाले की, सीओईपी संस्था जवळपास दोन शतकांपासून भारताचे भविष्य घडवत आहे. या संस्थेचा वारसा केवळ शैक्षणिक उत्कृष्टतेवरच नाही, तर तिने घडवलेले अभियंते, उद्योजक आणि राष्ट्रनिर्माते यांच्यावर आधारित आहे. सीओईपीने केवळ तंत्रज्ञान संस्था न राहता तांत्रिक विचार, नवोपक्रम आणि समस्या सोडवण्याचे जागतिक केंद्र बनण्याची आकांक्षा बाळगली पाहिजे. स्वच्छ ऊर्जा, प्रदूषण, जल सुरक्षा, शाश्वत गतिशीलता, प्रगत उत्पादन, कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), सेमीकंडक्टर्स आणि हवामान बदल यांसारख्या विविध क्षेत्रांतील आव्हानांकडे केवळ समस्या म्हणून न पाहता, नवोपक्रम, संशोधन आणि परिवर्तनात्मक उपायांच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे, असे राज्यपालांनी अधोरेखित केले. सीओईपीचे माजी विद्यार्थी ही तिची सर्वात मोठी ताकद आहे. ते देशभरात आणि जगभरात विद्यापीठाचे दूत आहेत, जे संस्थेचा सन्मान वाढवतात आणि विद्यार्थ्यांच्या भावी पिढ्यांना प्रेरणा देतात. माजी विद्यार्थ्यांचे बौद्धिक भांडवल विद्यापीठाच्या प्रयोगशाळा, विद्यार्थी आणि स्टार्टअप परिसंस्थेशी जोडले गेल्यास मार्गदर्शन आणि नवोपक्रमाचे एक शक्तिशाली चक्र निर्माण होऊ शकते, ज्यामुळे मोठी गुंतवणूक आणि नवीन उद्योग उभे राहू शकतात, असे वर्मा यांनी सांगितले. भविष्यातील विद्यापीठे एकाकीपणे काम करू शकत नाहीत; त्यांना शिक्षण क्षेत्र, उद्योग, सरकार आणि समाज एकत्र येऊन समस्या सोडवतील असे खुले व्यासपीठ बनावे लागेल. सीओईपीने उद्योग, आघाडीची जागतिक विद्यापीठे, संशोधन संस्था आणि स्टार्टअप्स यांच्याशी भागीदारीच्या संधी शोधल्या पाहिजेत, असे आवाहनही राज्यपालांनी केले. विद्यापीठाने केवळ क्रमवारीतच नव्हे, तर संशोधन, नवोपक्रम, पेटंट्स, तंत्रज्ञान हस्तांतरण, स्टार्टअप्स आणि जागतिक शैक्षणिक सहकार्यामध्ये भारतातील सर्वोच्च संस्थांपैकी एक बनण्याची महत्वाकांक्षा बाळगावी. शिक्षण हा केवळ करिअरचा मार्ग नसून समाजाच्या कल्याणाचे एक महत्त्वाचे साधन आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले ज्ञान आणि क्षमतांचा उपयोग समाज आणि राष्ट्राच्या कल्याणासाठी करावा, असे आवाहन राज्यपालांनी विद्यार्थ्यांना केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *