![]()
चाकण औद्योगिक वसाहतीमधील वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांमुळे होणाऱ्या जीवघेण्या अपघातांना कंटाळून तब्बल 20 लघुउद्योगांनी आपल्या कंपन्यांना टाळे लावण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या गंभीर प्रश्नावरून औद्योगिक क्षेत्रातील वातावरण चांगले
.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी शॉर्ट, मिड आणि लॉंग टर्म उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आरएमसी (RMC) सारखे मटेरियल वापरून शॉर्ट टर्ममध्ये खड्डे बुजवले जातील, असे त्यांनी सांगितले. तसेच, यापुढील ठोस कारवाई आणि उपाययोजनांबद्दल बोलताना सामंत म्हणाले की, अनेक रस्ते मंजूर झालेत, जे कंत्राटदार वेळेत काम करत नाहीत, त्यांना ब्लॅक लिस्ट टाकलं जाईल. घनकचरा प्रश्न महत्वाचा आहे. आम्ही त्यासाठी जागा देतोय. PMRDA त्याबाबत टेंडरही काढेल.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकणमधील समस्यांवर उपाययोजनांची माहिती देताना सांगितले की, अनधिकृत पार्किंग आणि ट्रॅफिक बाबत पोलिस कठोर कारवाई करतील, तसेच तीन-तीन मीटरने रस्ते आणि सब स्टेशन वाढवले जातील. PWA कडील 59 कोटींच्या रस्त्यावरील खड्डे रात्रीत भरले गेले असून, ट्रक टर्मिनल उभारण्यासोबतच MIDC ने हॉस्पिटलला जागा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर संबंधित मंत्री स्वतः येऊन बैठक घेतील आणि दर शुक्रवारी पुणे जिल्हाधिकारी ‘दरबार’ घेऊन वेळोवेळी तोडगा काढतील. यापुढील नियोजनाबाबत आपली स्पष्ट भूमिका मांडताना सामंत म्हणाले की, मी सुद्धा प्रत्येकवेळी येईन किंवा बैठक घेईन. आजपासून दहा महिन्यात उद्योजकांना अपेक्षित सर्व कामं पूर्ण करण्याची डेडलाईन ठरविण्यात आली आहे. तसेच, मी स्वतः प्रत्येक दोन महिन्याला बैठक घेणार आणि या सर्व कामांचा आढावा घेणार, अशी ग्वाही सामंत यांनी दिली आहे.
दरम्यान, उद्योगमंत्री उदय सामंत यांनी चाकण MIDC मधील पाणीपुरवठ्याचा प्रश्नही लवकरच मार्गी लावला जाईल, असे स्पष्ट केले. जलजीवन मिशनच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना राबवल्या जातील. तसेच या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील स्वतः चाकणला भेट देतील, अशी माहिती सामंत यांनी दिली.