![]()
अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना निकृष्ट आणि कमी उगवणशक्तीचे बोगस बियाणे विकल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार बळवंत वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. जिल्ह्याच्या अनेक भागांत शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आणि तूर बियाणे पुरवण्यात आल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत, कारण पेरणीनंतर बियाणे उगवलेच नाही किंवा त्याची वाढ समाधानकारक झाली नाही. या गंभीर प्रकाराची दखल घेत खासदार वानखडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. बोगस बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करावी आणि बाधित शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे. अल निनोच्या प्रभावामुळे यंदा पावसाळा उशिरा सुरू झाला, त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्याही उशिरा केल्या होत्या. अशा परिस्थितीत बोगस बियाण्यांचा प्रकार समोर आल्याने शेतकरी अधिकच हवालदिल झाले आहेत. खासदार वानखडे यांनी जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन, बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे तातडीने सर्वेक्षण करावे आणि त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली आहे. निकृष्ट बियाणे पुरवठा करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
Source link
अमरावती जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई द्या:खासदार बळवंत वानखडे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी