![]()
गेल्या आषाढी यात्रेत वारकऱ्यांच्या सुविधेसाठी उभारलेले काही वॉटरप्रूफ मंडप गळत होते, अरणमध्ये हाच वॉटरप्रूफ मंडप कोसळून ग्रामपंचायत कर्मचारी जखमी झाला. कुर्डुमध्येही तीच निकृष्ट कथा घडली…मग असं असतानाही यंदाही ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची कामे देण्यासाठी पायघड्या का अंथरल्या जात आहेत? संबंधित ठेकेदारासोबत साटंलोटं आहे का? असा ’बॉम्ब’ कुर्डुचे जिल्हा परिषद सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी ऐन जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत टाकताच सभागृहात सन्नाटा पसरला. काही अधिकाऱ्यांचे चेहरे पडले होते. वारकऱ्यांसाठी जर्मन हँगर, वॉटरप्रुफ मंडप, पाणी टँकर, औषधांसह इतर सुविधांच्या निविदेला मंजुरी देण्यासाठी जिल्हा परिषदेची विशेष सभा गुरुवारी पंढरपूरमध्ये घेतली. आषाढी यात्रेसाठी पुणे, सातारा, सोलापूर जिल्ह्यातून लाखो वारकरी पायी चालत पंढरपूरला येणार आहेत. या वारकऱ्यांना मुक्कामाच्या ठिकाणी व पालखी मार्गावर जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाणी टँकर, औषधोपचार, महिला स्नानगृह, फिरते शौचालय, मोबाईल चार्जिंग व्हॅन यासह इतर कामांसाठी जिल्हा परिषदेच्या विविध विभागामार्फत ६१ कोटी ५० लाखांचा खर्च करण्यात येणार आहे. यापैकी सध्या २२ कोटी रुपये शासनाकडून मिळाले आहेत. निविदांना मंजुरी देण्यासाठी ही विषय सभा घेतली होती. अण्णासाहेब ढाणे म्हणाले, सभा घेण्यापूर्वी सदस्यांकडून सूचना घेणे आवश्यक होते. कुर्डुवाडी येथील पुलाचे काम अर्धवट आहे. बावी येथे देखील रस्ता खराब असून मोटरसायकल व कार अपघाताचे प्रमाण वाढले आहे. संत एकनाथ महाराजांची पालखी कुर्डूला येते. पालखी रेल्वे रोड क्रॉस करून येत असल्याने तासभर रेल्वे गाड्या कुर्डूवाडी स्टेशनवर थांबवाव्या लागतात. पालखीचा रथ रेल्वे रुळावरून काढण्यासाठी रुळावर पोती टाकून रुळ सपाट करावा लागतो. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजीत पवार, शिक्षण आरोग्य सभापती केदार सावंत, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, महिला बालकल्याण सभापती अमृता वाघे, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामाप्पा चिवडशेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यासह जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी व विभागप्रमुख, सदस्य उपस्थित होते. पालखी सोहळ्या सोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना ५ हजार तात्पुरते शौचालय २३ जर्मन हँगर व ३७ वॉटरप्रूफ मंडप, १६७ हिरकणी कक्ष, ४० स्वागत कमान, २२० टँकर, ५०० स्नानगृह, १७ मोबाईल चार्जिंग व्हॅन, १३ मुख्यमंत्री आरोग्य रथ, ७५० चरण सेवा फूट मसाज उपलब्धता करण्यात आली आहे. पालखी मार्गावरील जिल्ह्यात एकूण २३ स्वागत कमान उभारण्यात येणार आहेत. जिल्हा परिषद सदस्य अतुल पवार तसेच चरणराज चवरे यांनी देखील सांगोला, मोहोळ आणि माढा तालुक्यातून येणाऱ्या पालखी मार्गावरील देखील वारकऱ्यांना प्रशासनाच्या वतीने सुविधा पुराव्यात असे सूचवले. लक्ष्मी टाकळी गावाला पाच लाखांऐवजी १२ लाखांचा निधी मिळावा, अशी मागणी सदस्य वाघमारे यांनी सभेत केली. संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासह दहा मानाचे पालखी सोहळे राज्यातील विविध जिल्ह्यातून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारकरी भाविकांना विविध सुविधा मिळाव्यात यासाठी जिल्हा परिषदेने तयारी पूर्ण केली आहे. दहा मानाच्या पालखी सोहळ्यांचे एकूण ८१ गावात ३८ मुक्काम तर ४३ विसावे तसेच सात रिंगण सोहळे होणार आहेत. हिरकणी कक्षात महिलांसाठी बेड सॅनिटरी, पॅड, खुर्ची, पिण्याचे पाणी, लाईट, पंखे, कचरा पेटी सेंट्रल पॅड वेडिंग मशीन व डिस्पोजल मशीन उपलब्ध करण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेकडून वड, पिंपळ, कडुलिंब, चिंच, आपटा आधी जातींच्या दहा हजार वृक्षांची लागवड पालखी मार्गावर करण्यात येणार आहे. ९५ पशुवैद्यकीय पथक नियुक्त केले आहे.
Source link
आषाढी तयारी:मागील वारीत वॉटरप्रूफ मंडपाला गळती; तरीही, मक्तेदारावर मेहरबानी का?- ढाणे